इंडोनेशियाच्या बंदीने इंडियातील ‘फोडणी’ला महागाईचा ‘तडका’, पामतेल निर्यातीवर बंदी घातल्याने खाद्यतेलाच्या किंमती भडकणार
जगातील सर्वात मोठ्या पाम तेल उत्पादकांपैकी एक असलेल्या इंडोनेशियाने 28 एप्रिलपासून पामतेल निर्यातीवर बंदी घातली आहे. ही माहिती आगीसारखी पसरल्यानंतर घरगुती तेलाच्या किंमती भडकण्याची शक्यता आहे. भारत दरवर्षी 70 हजार कोटी रुपयांचे पामतेल आयात करतो.
गहु, तांदुळ आणि अन्य अन्नधान्याची निर्यातीचा रेकॉर्ड करणा-या भारताला लवकरच मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. पामतेलाच्या (Palm Oil) आयातीवर निर्भर असणा-या भारताला महागाईचा फटका बसू शकतो. जगातील सर्वात मोठ्या पाम तेल उत्पादकांपैकी एक असलेल्या इंडोनेशियाने (Indonesia) 28 एप्रिलपासून पामतेल निर्यातीवर बंदी (Export Ban) घातली आहे. ही माहिती आगीसारखी पसरल्यानंतर घरगुती तेलाच्या किंमती भडकण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय खाद्य तेल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी खाद्यतेलाच्या किंमती (Edible Oil Price) या बंदीमुळे भडकतील असे स्पष्ट केले आहे. बंदी अगोदर पामतेल प्रति 10 किलो किरकोळ भावात 1470 रुपयांना मिळत होते. बंदीची घोषणा होताच हा भाव 1525 रुपयांवर जाऊन पोहचला. भारत दरवर्षी 70 हजार कोटी रुपयांचे पामतेल आयात करतो.
भारत मोठा आयातदार
अध्यक्ष ठक्कर यांनी स्पष्ट केले की, भारत कच्चे पामतेल-पामोलिन इंडोनेशियाकडून तर पक्के पामतेल-रिफाइंड तेल मलेशियाकडून आयात करतो. भारत हा पामतेलाचा मोठा आयातदार देश आहे. आपल्या एकूण खाद्यतेलाच्या 65 टक्के तेलाची इंडोनेशियाकडून आयात करण्यात येते. हा आकडा फार मोठा आहे. त्यामुळे इंडोनेशियाने पामतेल निर्यातीवर लादलेली बंदी भारतीय स्वयंपाकगृह, हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाबे यांच्यासाठी संकटाची चाहुल आहे. कारण त्यामुळे किचनचे बजेट कोलमडणार आहे. तेलाच्या किंमती पुन्हा भडकल्याने सर्वसामान्य भारतीयाला इंधनासोबतच खाद्यतेलाच्या किंमती रडवणार आहे. इंडोनेशियाच्या या भूमिकेमुळे मलेशियाचे फावले आहे. हा देश आता रिफाइंड तेलाच्या वाढवण्याची भीती आहे.
आता हवे आत्मनिर्भरतेकडे पाऊल
भारत खाद्यतेलाच्या बाबतीत अद्याप आत्मनिर्भर नाही, त्याचा मोठा फटका आता देशाला बसणार आहे. सरकार यासाठी प्रयत्नरत असले तरी कमी किंमतीमुळे शेतक-यांनी तेलबियांच्या उत्पादनाकडे पाठ फिरवली आहे. त्याचा मोठा दुष्परिणाम आता भोगावे लागत आहे. अन्न आणि सार्वजनिक पुरवठा विभागाच्या अहवालानुसार, खाद्यतेलाची घरगुती मागणी जवळपास 250 लाख टन इतकी मोठी आहे. तर उत्पादन अगदी नगण्य म्हणजे 112 लाख टनाच्या जवळपास आहे. 56 टक्क्यांची ही तूट भरून काढण्यासाठी भारताला इतर देशांवर अवलंबून रहावे लागत आहे. खाद्यतेल आयातीवर भारताचा दरवर्षी 70 हजार कोटी रुपयांचा खर्च होतो. हा आकडा डोळे विस्फरणारा आहे. आता इंडोनेशियाने घेतलेल्या बंदीच्या निर्णयाने सर्वसामान्य भारतीयांचे कंबरडे मोडणार आहे आणि सरकारसाठी ही धोक्याची घंटा आहे.
संबंधित बातम्या :