पाकिस्तानचे तुकडे होणारच? आता थेट सैन्याला अल्टिमेटम, लष्कर मागे घ्या, अन्यथा…
Balochistan : बलुचिस्तानमधील फुटीरतावादी नेते मीर यार बलोच यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा अल्टिमेटम दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

गेल्या काही काळापासून पाकिस्तानचे दोन तुकडे होणार असल्याची चर्चा सुरू आहे. पाकिस्तानातून बलुचिस्तान हा वेगळा देश निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता बलुचिस्तानमधील फुटीरतावादी नेते मीर यार बलोच यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा अल्टिमेटम दिला आहे. पाकिस्तानने आपले संपूर्ण सैन्य आणि सुरक्षा दल बलुचिस्तानमधून हटवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाने बलुचिस्तानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मीर यार बलोच यांचे निवेदन
मीर यार बलोच यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक निवेदन जारी केले आहे. यात त्यांनी पाकिस्तानी सैन्य या भागात बेकायदेशीरपणे तळ ठोकून असल्याचा आरोप केला आहे. तसेच बलुचिस्तानमधील नैसर्गिक संसाधनांचे शोषण केले जात असल्याचा दावाही करण्यात आला आहे. पाकिस्तानी सैन्य या भागात राहून कायद्याचे उल्लंघन करत असून, बंदुकीच्या जोरावर येथील खनिजसंपत्ती लुटत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
शस्त्रे आणि लष्करी उपकरणे सोडून जाण्याची मागणी
बलोच यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, पाकिस्तानी सैन्याची उपस्थिती बलुचिस्तानमधील नागरिकांच्या जीवन, संपत्ती आणि व्यवसायांसाठी धोका आहे. बलुचिस्तान पाकिस्तानच्या सैन्याकडे आक्रमक शक्ती म्हणून पाहतो आणि त्यांची उपस्थिती या खास प्रदेशासाठी लागू असलेल्या कायद्यांचे उल्लंघन आहे. बलोच यांनी पुढे पाकिस्तानी सैन्याने बलुचिस्तान सोडण्यापूर्वी आपली शस्त्रे आणि इतर लष्करी उपकरणे याच ठिकाणी सोडून जावीत, अशी मागणी केली आहे. यामध्ये युद्धनौका, हेलिकॉप्टर, रणगाडे, जड तोफखाना आणि नौदलाची जहाजे यांचा समावेश आहे. हे सर्व लष्करी साहित्य बलुचिस्तानच्या संसाधनांमधून खरेदी करण्यात आल्याचा दावा करत ते याच प्रदेशात राहिले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
बलुचिस्तानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्या
आपल्या निवेदनात बलोच यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला बलुचिस्तानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याचे आवाहन केले आहे. तसेच पाकिस्तानी सैन्याला प्रदेशातून बाहेर पडण्यासाठी इमर्जन्सी एक्झिट उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच पाकिस्तानी सैन्य, फ्रंटियर कॉर्प्स, पोलीस आणि इतर सरकारी संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या गैर-बलोच पाकिस्तानी नागरिकांनीही हा प्रदेश सोडावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
