Praful Patel:अजितदादांशी कोणत्या विषयावर चर्चा? रोहित पवारांच्या आरोपानंतर प्रफुल्ल पटेल यांचा मोठा खुलासा
Praful Patel on Ajit Pawar: अजितदादांच्या विमान अपघाताची बाजू स्पष्ट होण्याऐवजी तिचा गुंता वाढतानाच दिसून येत आहे. आ. रोहित पवार यांनी याप्रकरणी पुराव्यासह अनेकबाबी समोर आणल्या आहेत. त्यात त्यांनी दादांना 27 जानेवारी रोजी निघण्यास उशीर झाल्याचा मुद्दा समोर आला. त्यावर प्रफुल्ल पटेल यांनी मोठा खुलासा केला आहे.

Praful Patel on Rohit Pawar: अजितदादांच्या अकाली एक्झिटने अनेकांना चटका लागला आहे. तर विमान अपघातात काळंबेरं असल्याचा आरोपही होत आहे. रोहित पवार यांनी दुसर्या पत्रकार परिषदेत विमानाचा अपघात की घातपात हा मुद्दा लावून धरला. त्यांनी या अपघातातील काही महत्त्वाच्या बाबी समोर आणल्या. त्यांनी यापूर्वी ज्या काही शंका व्यक्त केल्या. त्यातील काही मुद्यावरून राजकारण तापलं आहे. तर 27 जानेवारी रोजी पूर्व विदर्भातील एका बड्या नेत्याचा फोन आला. एका महत्त्वाच्या फाईलवर दादांची स्वाक्षरी आवश्यक असल्याने दादांना निघायला उशीर झाला आणि दुसर्या दिवशी दादांनी विमानाने जाण्याचा निर्णय घेतल्याचे रोहित पवार म्हणाले होते. त्यावर आता प्रफुल्ल पटेल यांनी पुन्हा त्यांची बाजू मांडली आहे. त्यांनी कोणत्या विषयासंदर्भात अजितदादांशी चर्चा केली याची माहिती दिली.
याविषयावर झाले दादांशी बोलणे
प्रफुल पटेल आणि अजित पवार यांचं विमान अपघाताच्या दिवशी कोणत्या विषयांवर बोलणं झालं ते सांगितलं आहे. अपघात होण्याच्या आदल्या दिवसी आपण अजित दादांशी फोनवरून संवाद साधला होता. अजित दादांचा अपघात होण्यापूर्वी पूर्व विदर्भातील एका नेत्याचा त्यांना फोन केला होता असा आरोप रोहित पवार यांनी केला होता. यावर प्रफुल पटेल यांनी आज प्रतिक्रिया दिली. मी दिल्लीत होतो तेव्हा शेतकर्यांच्या धानाच्या चुकाराच्या संदर्भात मी त्यांना फोन केला होता तर दादांनी त्यावर चुकाऱ्यांची व्यवस्था करतो असं म्हटलं अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
पुरावे असतील तेव्हाच बोलणार
तररोहित पवारांनी केलेल्या आरोपावर प्रफुल्ल पटेल यांची सावध प्रतिक्रिया दिली. रोहित पवारांनी अजित पवारांच्या विमान अपघातावर एक हादरवणारा आरोप केला. पायलटने अजित दादांचे विमान मुद्दाम खाली आपटलं आणि स्फोट घडवला असा आरोप त्यांनी केला. यावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. मी फार जबाबदार व्यक्ती असून राजकारणात अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे मी फार संयमाने बोलेल आणि माझ्याकडे जोपर्यंत पुरावे येणार नाही तोपर्यंत मी काहीही बोलणार नाही असे प्रतिक्रिया त्यांनी दिली.
सीबीआय चौकशी केली मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसने काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आणि अजित पवार विमान दुर्घटनेची सीबीआय चौकशीची मागणी केली. ही फार दुर्दैवी घटना आहे. या घटनेच्या सखोल तपास विविध यंत्रणेद्वारे होत आहे .राज्य सरकार सुद्धा तपास करत आहेत. परंतु यामध्ये अनेक लोकांनी शंका कुशंका व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे याची सखोल तपासणी होणे आवश्यक आहे. अचानकपणे एवढी मोठा दुर्घटना कशी होऊ शकते याची सीबीआय द्वारा चौकशी करण्यात यावी आणि ही महाराष्ट्रात घटना झाल्यामुळे राज्य सरकार याबाबत सीबीआयला चौकशी करण्यात सांगू शकते आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही काल निवेदन देऊन या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे असे पटेल म्हणाले.
ब्लॅक बॉक्सबाबत मोठी माहिती
AAIB स्वायत्त संस्था चौकशी करत असल्याने ब्लॅक बॉक्स संदर्भात मला अधिक माहिती नाही. मात्र ब्लॅक बॉक्स डॅमेज झाल्याची प्राथमिक माहिती आहे असे म्हणत त्यावर अधिक बोलणं प्रफुल्ल पटेल यांनी टाळलं.
सध्या राष्ट्रवादीच्या विलगीकरणावर कोणतीही चर्चा नाही
राष्ट्रवादी विलगीकरणावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले की अजित दादाच्या निधनानंतर आम्हाला याच्यातून सावरायचे आहे. आम्हाला विलगीकरणावर कोणतीही चर्चा करायची नाही अशी स्पष्ट भूमिका प्रफुल पटेल यांनी मांडली. तसेच आमच्या पक्षाच्या बाबत अनेक लोकांनी अनेक अफवा पसरवले आहेत. परंतु येणार्या 26 तारखेला विधिमंडळाची नेते, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून सुनेत्रा वहिनी याच राहतील असे त्यांनी स्पष्ट केले.
