एकनाथ शिंदे यांचे धक्कातंत्र… लवकरच मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? या आक्रमक नेत्याची थेट एंट्री… कार्यकर्त्यांनी उधळला गुलाल
Eknath Shine Cabinet Reshuffle: गेल्या सहा महिन्यांपासून मंत्रिमंडळ फेरबदलाला अखेर एकदाचा मुहूर्त लागण्याची दाट शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीनंतर काही नवीन आणि आक्रमक चेहरे मंत्रिमंडळात दिसण्याची शक्यता आहे. त्याचे संकेत आताच देण्यात आले आहेत.

Santosh Bangar Shivsena: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाकर फिरवणार आहेत. मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा सहा महिन्यांपासून सुरू आहे. पण त्याला मुहूर्त लागलेला नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीनंतर मात्र लवकरच मंत्रिमंडळात बदल होतील. काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याची दाट शक्यता आहे. मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्या जाहीर भाषणात त्याचे संकेत दिले आहेत. तर आता शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नवीन मंत्रिमंडळात कोण असेल, कोणता आक्रमक चेहरा असेल याविषयीचे मोठे वक्तव्य केले आहे. मराठवाड्यातील नेते आणि कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांना लवकरच मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे.
मंत्र्यांचं प्रगतीपुस्तक काय सांगतं?
महायुतीत भाजपने आमदार, खासदार आणि मंत्र्यांसाठी प्रगतीपुस्तक आखलं आहे. जनतेची प्रश्न मार्गी लावणारे, सरकारी बाजू, भूमिका मांडणारे आणि कामाचा झपाटा असलेल्या मंत्र्यांचा प्रगती अहवाल वेळोवेळी घेण्यात येतो. शिंदे सेनेतील काही मंत्र्यांचा अहवाल असमाधानकारक आहे. तर काहींकडे कामाचा झपाटा आहे. मंत्री उदय सामंत यांनी कुणाला डच्चू मिळणार हे अगोदरच त्यांच्या जाहीर भाषणात स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे वादग्रस्त ठरलेले अथवा पक्षाला साईडलाईन करणाऱ्या मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे. तर काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. काही मंत्र्यांचा खातेबदल होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे.
संतोष बांगर यांना मंत्रिमंडळात संधी?
‘संतोष बांगर जिल्ह्यापुरता मर्यादित असलेला कार्यकर्ता नाही. येणाऱ्या काळात त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात येईल’, असे मोठे वक्तव्य खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. त्यामुळे संतोष बांगर यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. हिंगोलीत शिवसंवाद दौऱ्या दरम्यान संतोष बांगर यांना मंत्री करा अशा आशयाचे बॅनर झळकले. त्याच सभेत श्रीकांत शिंदे यांनी हे वक्तव्य केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मंत्रिपदाची माळ बांगर यांच्या गळ्यात पडण्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. नांदेड येथील एका कार्यक्रमात संतोष बांगर यांनी त्यांच्याच मंत्र्यांवर टीका केली होती. त्यांनी काही मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेल्याने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची आग्रही मागणी त्यावेळी केली होती.
