विधानपरिषदेच्या जागा वाटपाबाबत महायुतीच्या गोटातून मोठी बातमी, एकाच जागेवर दोन पक्षांचा दावा, हालचालींना वेग
MLC Election : विधान परिषद निवडणुकीच्या 17 जागांच्या जागावाटपावरून महायुतीत मोठी रस्सीखेच सुरू असून 16 जागांवर एकमत झाल्याची माहिती आहे. मात्र एका जागेवर दोन पक्षांनी दावा केल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील 17 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. अशातच या निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाबाबत मित्रपक्षांमध्ये बोलणी सुरू आहेत. आज जागावाटपाबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. यात 16 जागांवर भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र एका जागेसाठी दोन पक्षांनी दावा केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता जागावाटपाबाबत हालचालींना वेग आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
एका जागेवर तिढा कायम
विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. आज जागावाटपाबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत एका जागेवर तिढा कायम असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र इतर 16 जागांवर महायुतीत एकमत झाले आहे. मात्र शिवसेनेला हवी असलेली अजून एक जागा भाजप सध्या तरी सोडण्यास तयार नाही, त्यामुळे घोडे अडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भेटी-गाठी वाढल्या…
आज सकाळी भाजपचे प्रदेशाध्यश्र रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर लागलीच सुनील तटकरे यांनी देखील एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली होती. या भेटींमध्ये जवळपास सर्वच जागांवर एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे. पण शिवसेनेकडून अजून एका जागेची मागणी करण्यात आली आहे. आता यावर अंतिम निर्णय देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार बैठक करून घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजप शिवसेनेला जास्त जागा सोडणार?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक राजकीय समीकरणांना महत्त्व असतं. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपने मोठी मुसंडी मारली होती. अनेक जण इतर पक्षातून भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे स्थानिक राजकीय समीकरणाला मोठा धक्का न लावता भाजप शिवसेनेला जास्त जागा सोडणार का? असा मोठा सवाल आहे. तर सेनेला अधिकची जागा दिल्यास राष्ट्रवादी पक्ष सुद्धा अधिक जागेसाठी आग्रह धरण्याची शक्यता आहे. भाजपसमोर मित्र पक्षांची नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
