Ubt Split : ठाकरेंसोबत असलेले खासदार राजाभाऊ वाजे यांच्या वडिलांचा ऑफरबाबत खळबळजनक गौप्यस्फोट, ‘एकनाथ शिंदेंनी आमच्याशी..’
Ubt Split : ऑपरेशन टायगरमध्ये नेमकी काय ऑफर देण्यात आली, त्या बाबत खासदार राजभाऊ वाजे यांच्या वडिलांनी गौप्यस्फोट केला आहे. राजभाऊ वाजे यांनी उद्धव ठाकरेंसोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. 14 एप्रिल रोजी राजाभाऊ वाजे यांच्या घरी एक कमिटी येऊन गेली.

ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणि दिल्लीत वेगवान राजकीय घडामोडी घडतायत. उद्धव ठाकरे गटाच्या 9 खासदारांपैकी सहा खासदार फुटून वेगळा गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरु आहेत. या राजकीय वादळात ठाकरेंसोबत जे तीन खासदार राहणार, ते अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजभाऊ वाझे आहेत. अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबईचे खासदार आहेत. राजभाऊ वाझे नाशिकचे खासदार आहेत. या ऑपरेशन टायगर संदर्भात राजभाऊ वाजे यांच्या वडिलांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.
ऑपरेशन टायगर हे गेल्या तीन-चार महिन्यापासून राबवलं जात असल्याची माहिती प्रकाश वाजे यांनी दिली. 14 एप्रिल रोजी राजाभाऊ वाजे यांच्या घरी एक कमिटी येऊन गेली. या कमिटीने पन्नास कोटी रुपयांसह मतदारसंघात 100 कोटींच्या विकास कामांची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट राजभाऊ वाजे यांच्या वडिलांनी केला. मात्र राजाभाऊ वाजे यांच्यासह त्यांच्या वडिलांनी या ऑफर्सला नकार देत ठाकरेंसोबतच राहण्याची भूमिका घेतली.
15 कोटी रुपये Advance मिळाले का?
दरम्यान दिल्लीला निघालेल्या राजभाऊ वाजे यांच्याशी टीव्ही 9 मराठीने ते ट्रेनमध्ये असताना संपर्क साधला. त्यावेळी राजभाऊ वाझे म्हणाले की, “माझ्याशी कोणी संपर्क साधला नाही. मी उद्धव ठाकरेंसोबतच राहणार. एकनाथ शिंदे यांना माझ्याशी संपर्क साधायचा असता तर आधी प्रयत्न केला असता. पण मी आहे तिथेच राहणार” संजय राऊत यांनी फुटणाऱ्या खासदारांना 15 कोटी रुपये Advance मिळणार असा दावा केलाय. त्यावर राजाभाऊ वाझे म्हणाले की, ‘माझ्याशी कोणी संपर्कच केला नाही, तर पैशांच्या ऑफरचा प्रश्न येतच नाही’
शिवसेनेने आम्हला आमदारकी, खासदारकी दिली
“शिवसेनेत ऑपरेशन टायगर सुरु आहे. मात्र कोणत्याही परस्थिती मध्ये आम्हाला पक्ष सोड्याचा नाही. हे मी राजाभाऊ वाजे यांना सांगितलं आहे. ती मंडळी आमच्याकडे आलीय. आम्ही नाही सांगितले . राजाभाऊ वाजे यांना ठाण्याला बोलावले. आम्ही व्यावसायिक राजकीय नाही” असं प्रकाश वाजे म्हणाले. “शिवसेनेने आम्हला आमदारकी, खासदारकी दिली आहे. नार्वेकर यांचा फोन आला. आम्ही उद्धव ठाकरे यांना सांगितले, आम्ही तुमच्यासोबत आहोत. ही ठाण्याची मंडळी होती. मी ओळखत नाही. राजाभाऊ यांनी सांगितले, मी निर्णय घेऊ शकत नाही. म्हणून माझ्याकडे आले” असं प्रकाश वाजे म्हणाले.
कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याची खेळी
भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टीकर, संजय पाटील, ओमराजे निंबाळकर , संजय देशमुख, हे खासदार ठाकरेंची साथ सोडून स्वतंत्र गट स्थापन करणार अशा चर्चा आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे हे काल रात्रीच दिल्लीत दाखल झाले आहे. आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची हे खासदार भेट घेऊन स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी पत्र देतील अशी माहिती मिळतेय. ठाकरे गट फुटीर खासदारांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याची खेळी खेळू शकतो.
