Priyanka Chaturvedi: ‘भारतीय महिलांसाठी हा दुःखद दिवस’, पक्षालाच घरचा आहेर, प्रियंका चतुर्वेदींचे उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेविरोधात मत?
Priyanka Chaturvedi Tweet on Women Reservation: महिला आरक्षणावरून लोकसभेत दोन दिवस रणकंदन दिसले. नारी शक्ती वंदन बिल मंजूर होणे कठीण असतानाही सरकारने ते रेटले आणि नामंजूर झाले. पण यादरम्यान अनेक घडामोडी समोर आल्या. उद्धव सेनेच्या माजी खासदार आणि नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांच्या भूमिकेने उद्धव सेनेतील धुसफूस पुन्हा समोर आली.

Priyanka Chaturvedi Tweet: महिला आरक्षण लोकसभेत नामंजूर झाले. विरोधकांनी भूमिका स्पष्ट करूनही सरकारने हे बिल रेटले आणि त्यानंतर अपेक्षित परिणाम दिसला. नारी शक्ती वंदन विधेयकावरून आता काही पक्षातील महिलांची नाराजी समोर येत आहे. त्यात उद्धव सेनेत तर ठिणगी पडल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून माजी खासदार आणि नेत्या प्रियंका चतुर्वेदी या पक्षावर नाराज असल्याचे समोर आले आहे. आता त्यांची नाराजी ठळकपणे समोर आली आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी थेट पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेविरोधात जाऊन महिला आरक्षण विधेयकाला समर्थन देणारी भूमिका जाहीर केली. त्यामुळे चतुर्वेदी यांनी बंडाचा पवित्रा घेतलाय की काय? अशी दबकी चर्चा सुरू झाली आहे.
उद्धव सेनेचे विरोधी भूमिका
महिला आरक्षण बिल हे 2023 मध्येच मंजूर झालेले असताना ते पुन्हा मंजूरीसाठी आणण्यामागे सरकारचा काय उद्देश आहे असा सवाल खासदार संजय राऊत यांनी यापूर्वीच विचारला होता. तर उद्धव ठाकरे यांनी खासदारांना या विधेयकाला विरोध केला होता. पक्षाची भूमिका अगदी स्पष्ट होती. उद्धव सेना INDIA सोबत असल्याचे दिसून आले. पण त्याचवेळी त्यांच्या राज्यसभेतील माजी खासदाराने घरचा आहेर दिला. प्रियंका चतुर्वेदी यांनी पक्षविरोधी भूमिका घेतलीच नाही तर ती समाज माध्यमांवर जाहीरही केली. त्यामुळे वादाची ठिणगी पडली आहे.
हा भारतीय लोकशाहीसाठी दु:खाचा दिवस
प्रियंका चतुर्वेदी यांनी समाज माध्यमांवर महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याप्रकरणी एक ट्वीट केले आहे. महिला आरक्षण विधेयक मंजूर न होणे हा भारतीय लोकशाहीसाठी दुःखाचा दिवस असल्याचे त्यांनी जाहीर केले. ज्या महिलांना संसदेत आणि विधानसभेवर निवडून जाण्याची इच्छा होती, त्यांच्यासाठी ही अत्यंत दुःखद बाब असल्याचे त्या म्हणाल्या. आपली भूमिका ही सातत्याने महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूने राहिलेली आहे. त्यामुळेच या मुद्यावर आवाज उठवल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर महिला आरक्षणाबाबत सतत आवाज उठवत राहणार. आपली भूमिका सोयीनुसार बदलणार नाही. जर मी जशी आहे तसे पचनी पडत नसेल तर तो तुमचा प्रश्न आहे, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला आहे.
महिला आरक्षणाबाबत 131 वी घटना दुरुस्ती विधेयक केंद्र सरकारने लोकसभेसमोर मांडले होते. हे विधयेक मंजूर करण्यासाठी दोन तृतीयांश मतांची गरज होती. विधेयकाच्या बाजूने 298 आणि विरोधात 230 मतं पडली. घटनादुरुस्तीसह नारी शक्ती वंदन बिल काही मंजूर होऊ शकले नाही.
