Rohit Pawar : नवीन संविधानात राष्ट्रवादीचा ‘कणा’च हरवला; त्या मोठ्या बदलाचा सोशल इंजिनिअरिंगला फटका? रोहित पवारांचा तो आरोप काय?
Rohit Pawar on Ajit Pawar NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या संविधानात ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठा बदल केल्याचा आरोप शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला. त्यांनी दोन्ही नेत्यांवर पुन्हा नव्याने आरोपांची राळ उडवून दिली. काय आहे तो मोठा आरोप, ज्याचा राष्ट्रवादीच्या सोशल इंजिनिअरिंगला बसू शकतो फटका?

Rohit Pawar on Ajit Pawar NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या संविधानाता ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठा बदल केल्याची तोफ आमदार रोहित पवारांनी डागली. अजितदादांच्या विमान अपघातानंतर रोहित पवार हे या दोन्ही नेत्यांविरोधात आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. संधी मिळताच ते दोन्ही नेत्यांवर प्रहार करत आहेत. आता त्यांनी अजून एक मोठा बॉम्ब गोळा टाकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संविधानात पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बदल केला असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. राष्ट्रवादी पक्षाच्या संविधानात केलेले बदल रद्द करण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी पत्र पाठवल्याचा दावाही रोहित पवारांनी केला आहे.
पक्षाच्या सोशल इंजिनिअरिंगला फटका?
या बदल केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन संविधानात पक्षाचा कणा म्हणून ओळखले जाणारे अल्पसंख्याक सेल,सामाजिक न्याय सेल आणि ओबीसी सेल हे काढून टाकण्यात आले आहेत. जुन्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संविधानात जवळपास ७ फ्रंटल सेल नमूद होते. आत्ता काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संविधानात जे बदल करण्यात आले आहेत त्या मधे युवक,विद्यार्थी,महिला आणि सेवादल याच सेलचा उल्लेख पाहायला मिळत आहे. पक्षाच्या संविधान मधे या पद्धतीने बदल करण्यात आला आहे हे समजताच सुनेत्रा पवार यांनी हे सर्व बदल रद्द करण्यात यावे असा पत्र निवडणूक आयोगाला पाठवलं, असा दावाही रोहित पवार यांनी केला आहे.
तटकरे आणि पटेलांवर बॉम्बगोळा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या संविधानात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी बदल केल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. या बदलामुळे अल्पसंख्याक, ओबीसी आणि सामाजिक न्याय हे सेल नसल्याचा दावा करण्यात आला आहे. रोहित पवार हे वारंवार या दोन्ही नेत्यांवर आरोप करत आहेत. हे दोन्ही नेते त्यांच्या टार्गेटवर आल्याचे दिसते. तर दोन्ही राष्ट्रवादीत चेकमेट सुरू असल्याचेही बोलले जात आहे. त्यात अजितदादातील काही नेत्यांविरोधातील प्रकरणं समोर आणली जात असल्याने पक्षाला अडचणीत आणण्याचे प्रयत्नही सुरू असल्याचे दिसते.
