Sanjay Raut: दाक्षिणात्यांची जात्यंधता नी मुस्लिमांची धर्मांधता… मराठी माणसांना राऊतांचा तो सल्ला काय?
Sanjay Raut Criticized Governor: राजभवनात भाजपचे एजंट बसल्याची घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी केली. तामिळनाडूतील सत्ता स्थापनेच्या पेच प्रसंगावर त्यांनी अनेक मुद्दांना स्पर्श करत भाजपवर निशाणा साधला.

Sanjay Raut Criticized Governor: TVK यांचे 108 आमदार निवडून आले आहेत.राज्य घटना हे सांगते की सर्वात मोठ्या पक्षाला सर्वात आधी सत्ता स्थापनेसाठी बोलवले जाते. विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागते. पहाटेच्या शपथविधीवेळी महाराष्ट्रात भगतसिंग कोश्यारी यांनी बहुमत पाहिले होते का? राजभवनात भाजपचे एजंट बसले आहेत. नावच केवळ लोकभवन केले आहे. पण त्याच भवनात लोकांच्या भावनांची हत्या होते. तामिळनाडूत भाजपचा एक आमदार निवडून आला आहे. तेव्हा त्याला राज्यपालांनी बोलावावं आणि विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगावं, त्याला पाच वर्षे द्यावे, हे भाजप करू शकतं, असं काल मी ट्वीट केलं होतं. तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे गोव्याचे आहेत. आर्लेकरांना कोणी संविधानाचे धडे दिले पाहिजे, असा भीमटोला खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत हाणला.
दाक्षिणात्यांची जात्यंधता, मुस्लिमांची धर्मांधता
टीव्हीके सारख्या पक्षाने दोनच वर्षात तामिळनाडूत जोर बैठका मारून प्रस्थापित पक्षांना घाम फोडला. सर्वाधिक 108 जागा खिशात घातल्या. पण असा चमत्कार महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांना का करता आला नाही याविषयी राऊतांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढली. दाक्षिणात्यांची जात्यंधता आणि मुसलमानांची धर्मांधता जोपर्यंत मराठी माणसाच्या अंगात भिन्नत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात क्रांती होत नाही, असे ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र आपण पुरोगामी म्हणतो. महाराष्ट्र जपून पावलं टाकतो. टीव्हीकेला काही आगापिच्छा आहे का, एका कलाकाराने पक्ष उभा केला. त्याला काही आकार, उकार आहे का? नाही. स्टॅलिन यांनी उत्तम काम केले. ही वाऱ्यावरची वरात असते. टीव्हीके सुद्धा एक प्रादेशिक पक्ष आहे, असे विश्लेषण संजय राऊत यांनी केले.
ममता बॅनर्जी यांच्या आंदोलनाला पाठिंबा
ममता बॅनर्जी यांच्या आंदोलनाला इंडियाआघाडीचा पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे यांची ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा झाली. सर्वच लोक ममता बॅनर्जी यांच्या आंदोलनात सहभागी होतील. पश्चिम बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताच प्रश्न नाही. भाजप जिथे सरकार स्थापन करते, त्या राज्याची कायदा आणि सुस्थिती आपोआप खालावते. खराब होते, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला.
