राष्ट्रवादीच्या बैठकीत खडाजंगी… त्यानंतर रात्री उशिरापर्यंत भुजबळ भाजपच्या कोणत्या बड्या नेत्यासोबत होते? मोठी अपडेट समोर
Chhagan Bhujbal-Sunil Tatkare: राष्ट्रवादी काँग्रेसमधील बैठक वादळी ठरली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात खडाजंगी झाल्याची माहिती समोर येत आहे. पण त्यानंतरची अपडेट खळबळ उडवणारी आहे.

Chhagan Bhujbal-Sunil Tatkare: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून घमासान सुरू आहे. बडे नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर सर्वच बाजूंनी जोरदार टीका होत आहे. तर तांत्रिक चुका दाखवत त्यांची पदही पक्षाच्या काही याद्यांमधून गायब झाल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक वादळी ठरली. या बैठकीला प्रफुल पटेल हे काही कारणांनी गैरहजर राहिले तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आक्रमक पद्धतीने त्यांची बाजू मांडल्याचे समजते. पक्षातून आणि बाहेरून जोरदार हल्ले होत असताना आमच्या पाठीशी पक्षातील कोणीही उभे राहिले नाही. आमच्या बाजूने बोलायला कुणी समोर आले नाही अशी व्यथा त्यांनी मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या मुद्यावरून मंत्री छगन भुजबळ आणि तटकरे यांच्यात खडाजंगी झाल्याचे समजते. तर माध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी वाद झाला नसल्याचे सांगितले. आपण त्यांना केवळ आवरतं घेण्यास सांगितल्याची माहिती त्यांनी दिली. तर त्यानंतर छगन भुजबळ हे भाजपच्या एका नेत्यासोबत असल्याची माहिती समोर आली आहे.
भुजबळ कोणत्या भाजप नेत्यासोबत?
तर राष्ट्रवादीतील या घाडमोडींवर महसूलमंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यात काही वाद झाला असे मला वाटत नसल्याचे ते म्हणाले. छगन भुजबळ काल रात्री उशिरापर्यंत माझ्या सोबत होते. त्यामुळे वाद झाल्याची बातमी तुमच्याकडे कुठून आली मला माहिती नाही अशी पुश्ती त्यांनी जोडली.
ओबीसींच्या अडचणी केंद्रासमोर मांडणार
गेल्या आठवड्यात ओबीसी कॅबिनेट सबकमिटीची बैठक माझ्या नेतृत्वात झाली. त्यामध्ये सर्व ओबीसी मंत्री उपस्थित होते. आम्ही काही अजेंडा ठरवला आहे. केंद्राकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांबद्दल आम्ही केंद्र सरकारकडे जाणार आहोत. राज्यातील ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवणे, मंत्रिमंडळ ओबीसी उपसमितीची जबाबदारी आहे. मराठा आणि ओबीसी समोरासमोर येणार नाही. एकमेकांच्या ताटातला दुसर्याला दिला जाणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ असे असे मोठे वक्तव्य मंत्री बावनकुळे यांनी केले.
काँग्रेसला मोठे आव्हान
विधानपरिषद निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा बावनकुळे यांनी व्यक्त केली. काँग्रेसला विनंती करतो विधान परिषदेच्या विविध मतदारसंघांमध्ये भाजप आणि मित्र पक्षांचे मतदार 70% पर्यंत आहे. काँग्रेसने उन्हाळ्याच्या काळात अनावश्यक खर्च न करता निवडणूक बिनविरोध करावी अशी विनंती आहे. गरज भासल्यास मी या संदर्भात डीटी बार आणि काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा करू. दुष्काळी परिस्थितीमध्ये निवडणूक लढवण्यापेक्षा ती बिनविरोध करू अखेरीस निवडणुकीचा निर्णय बहुमताप्रमाणे होत असतो असे वक्तव्य बावनकुळे यांनी केले.
तर महायुतीच्या जागा वाटप बद्दल बैठकीची दिल्लीत गरज नाही. आमचे प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री आणि दोन्ही मित्र पक्षातील नेते आपापसात बसून निर्णय करू शकतील. उद्यापर्यंत महायुतीच्या जागा जाहीर होईल. महायुतीची विधान परिषद जागा वाटप बद्दलची चर्चा 99% पूर्ण झाली आहे. फक्त तीनही पक्षातील प्रमुख नेत्यांना बसून निर्णय अंतिम करायचं आहे. महायुतीचा जागावाटप उद्यापर्यंत अधिकृतपणे जाहीर होईल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका
पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर अश्लाघ्य टीका करत हर्षवर्धन सपकाळ यांनी मूर्खपणा, नीचपणा आणि नालायकपणाचे वक्तव्य केले आहे. सपकाळ यांची राजकीय उंची किती आणि कोणावर बोलत आहे याचे भान त्यांनी ठेवावे. सपकाळ यांनी यानंतर अशा पद्धतीची अश्लील भाषा पंतप्रधान आणि मुख्यमंत्री संदर्भात केली तर भाजपचे कार्यकर्ते त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. सपकाळच्या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आक्रोश निर्माण होईल, असे बावनकुळे म्हणाले.
