ओबीसींच्या आरक्षणाला धक्का? मनोज जरांगेंचे उपोषण मागे… सरसकट शब्दावर बोट ठेवत बबनराव तायवाडे यांचा मोठा इशारा
Babanrao Taywade Big reaction on Manoj Jarange Patil: मराठा-कुणबी, कुणबी-मराठा प्रमाणपत्र वाटप होत नसल्याच्या नाराजीने मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचे शस्त्र उपसले होते. सरकारच्या आश्वासनानंतर काल रात्री उपोषण मागे घेण्यात आले. या सर्व घडामोडींवर बबनराव तायवाडे यांनी मोठा इशारा दिला आहे.

Babanrao Taywade reaction on Manoj Jarange: 58 लाख कुणबी नोंदी सापडूनही कुणबी प्रमाणपत्र वाटपात सरकारने खोडा घातल्याचा आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी काल एल्गार पुकारला होता. त्यांनी रखरखत्या उन्हात आमरण उपोषण सुरू केले. दोनदा शिष्टाईही कामी आली नाही. अखेर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना त्यांचे मन वळवण्यात यश आले. अनेक मागण्यांबाबत सरकारच्या अनुकूल भूमिकेनंतर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. या सर्व घटनाक्रमावर ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी मोठी भूमिका जाहीर केली आहे.
ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का नाही
मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणानंतर ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार असा आरोप करण्यात येत होता. त्यावर कालही बबनराव तायवाडे यांनी प्रतिक्रिया दिली होती. तर मुंबईच्या मराठा समाजाच्या आंदोलनावेळीही त्यांनी ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागत नसल्याचा दावा केला होता. काल मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुटल्यावर आजही ते या भूमिकेवर ठाम आहेत.
मी पहिल्या दिवशीपासून आपणास सांगतो आहे यावेळी त्यांनी ज्या मागण्या सरकार पुढे मांडल्या होत्या ज्या मागण्या घेऊन आंदोलन सुरू केला होता त्यात नवीन काहीच नव्हतं. जे जुनं आहे तेच घेऊन त्यांनी आंदोलन पुकारलं होतं त्याची पूर्तता पहिलेच झालेली होती. आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का लागलेला नाही आणि सरसकट शब्द जो वापरला जातो कागद पुराव्याशिवाय आजोबा खापर पंजोबा यांच्या महसूल किंवा शैक्षणिक पुराव्यामध्ये नोंदी आढळत नाही त्याला ओबीसीचं प्रमाणपत्र मिळू शकत नाही हे सत्य झालेले आहे, असे ओबीसी नेते बबनराव तायवाडे म्हणाले.
तर ओबीसी प्रमाणपत्र देऊ नये
मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतलं. काय केलं हे त्यांचा प्रश्न आहे. ही त्यांची भूमिका आहे. आम्ही आनंदी आहोत कारण आमच्या मागण्यांना धक्का लागलेला नाही, असे बबनराव तायवाडे म्हणाले. गेल्या तीन वर्षांपूर्वी पासून आजपर्यंत आमची प्रमुख मागणी एकच आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये आणि कुठल्याही प्रकारचा पुरावा जे सरकार नियमानुसार आवश्यक आहे, त्यानुसार ओबीसीचे प्रमाणपत्र देऊ नये यापैकी कुठल्याही निर्णयाच्या विरोधात सरकारने निर्णय घेतला नाही. त्यामुळे आमच्या आरक्षणाला धक्का लागला नाही त्यामुळे त्यांना काय करायचं त्याचा विचार त्यांनी करावा, असे तायवाडे म्हणाले.
सरसकट कुठले प्रमाणपत्र देण्यास विरोध
आम्ही आमच्या भूमिकेवर कालही ठाम होती आणि आजही आम्ही ठाम आहोत. काल मुख्यमंत्री बोलले, त्यांचे मी अभिनंदन करतो. आम्ही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. सरसकट कुठले प्रमाणपत्र देणार नाही, असे कालच मुख्यमंत्री बोलले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तीन वर्षांपूर्वी जो शब्द दिला त्यावर ते ठाम आहेत. त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो. सरसकट कुठलेही प्रमाणपत्र देण्यास विरोध असल्याचे तायवाडे यांनी अधोरेखित केले.
