संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक, पंतप्रधान मोदींना खोचक सल्ला देत म्हणाले…
अमेरिका-इराण युद्धविराम चर्चेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर आणि श्रेयवादाच्या राजकारणावर जोरदार टीका केली आहे.

अमेरिका-इराणमध्ये गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेला संघर्ष संपता संपत नसल्याचे दिसत आहे. अमेरिका आणि इराणने बुधवारी युद्धविरामाची घोषणा झाली. त्यानंतर पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी येत शांततेच्या प्रस्तावावर चर्चा केली. पण पाकची राजधानी इस्लामाबाद येथे झालेली जगातील सर्वात महत्त्वाची राजनैतिक चर्चा अखेरीस कोणत्याही निष्कर्षाशिवाय संपली. तब्बल 21 तास चाललेल्या वाटाघाटींनंतरही अमेरिका आणि इराण यांच करारावर एकमत झालं नाही. आता पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये अलीकडे झालेल्या या चर्चांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या कार्यपद्धतीवर जोरदार निशाणा साधला आहे.
संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जागतिक स्तरावर सुरू असलेल्या घडामोडींचा संदर्भ देत पाकिस्तानच्या संयमी भूमिकेचे कौतुक केले. तसेच मोदी सरकारच्या होर्डिंग बाजी आणि श्रेयवादाच्या लढाईवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यासोबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक सल्ला दिला.
श्रेयवादाची गरज नसते
जगातील सर्वात मोठी घडामोड सध्या सुरू असून सर्वांचे लक्ष तिकडे लागले आहे. महायुद्ध संपविण्यासंदर्भात तीन राष्ट्र आणि काही प्रमुख नेते एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे, त्या प्रसिद्धीच्या साहित्यावर किंवा होर्डिंग्जवर तिकडच्या पंतप्रधानांचे किंवा राजकारण्यांचे फोटो नाहीत. हे पाहून आश्चर्य वाटते. एक आदर्श असे हे चित्र आहे. जर अशी एखादी मोठी घटना भारतात घडली असती, तर भाजपने तात्काळ कमळाचे चिन्ह टाकून संपूर्ण देश बॅनरने रंगवून टाकला असता. स्वतःची प्रसिद्धी करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला असता. पण देश अशा महत्त्वाच्या घडामोडींचे स्वागत करतो, त्यात श्रेयवादाची गरज नसते, असे संजय राऊत म्हणाले.
मोदींनी पाकिस्तानकडून शिकावे
यावेळी संजय राऊतांनी पाकिस्तानच्या भूमिकेचे कौतुक करताना अत्यंत खोचक टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भान ठेवले पाहिजे. ज्या पाकिस्तानला आपण अनेकदा अशिक्षित किंवा अडाणी म्हणतो, त्या पाकिस्तानने जागतिक घडामोडींमध्ये भान काय असते, हे दाखवून दिले आहे. इस्लामाबादमध्ये झालेल्या चर्चेला त्यांनी राजकीय रंग दिला नाही किंवा त्याचे श्रेयही घेतले नाही. भारतीय राज्यकर्त्यांनी, विशेषतः मोदींनी पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांकडून हे शिकले पाहिजे की अशा गंभीर घडामोडींच्या वेळी स्वतःची होर्डिंग बाजी कशी टाळायची, असा सल्ला संजय राऊतांनी दिला.
