इंधनाची बचत करा पंतप्रधान मोदींच्या आवाहानानंतर आता शरद पवार मैदानात, टायमिंगवरून सरकारला विचारले दोन मोजके प्रश्न
इंधनाची बचत करा, सोन्याची खरेदी वर्षभर टाळा, परदेश दौरे रद्द करा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला उद्देशून केलं आहे. त्यावर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

मध्य पूर्वेत सध्या मोठा तणाव पहायला मिळत आहे. अमेरिका आणि इराणमधील संघर्ष अजूनही कमी झालेला नाहीये. या पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ होर्मूज व्यापारी जहाजांसाठी बंद आहे. त्यामुळे भारतासह जगातील अनेक देशांवर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. तसेच परकीय चलनाचा देखील प्रश्न आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोंधित केलं आहे. त्यामध्ये त्यांनी इंधनाची बचत करा, पेट्रोल, डिझेल जपून वापरा. शक्य तिथे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा. वर्षभर सोनं खरेदी करू नका, तसेच परदेश दौरे देखील करू नका असं आवाहन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहानानंतर आता त्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहानाला गांभीर्याने घ्या, जर देशात बिकट परिस्थिती निर्माण होऊ नये असं वाटत असेल तर उपाय -योजना कराव्याच लागतील. यापूर्वी देखील अशा आव्हानाला देश सामोरं गेला आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. देशासमोर गंभीर परिस्थिती आहे, त्यामुळे पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान नुकत्याच पाच राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्या, तीन ठिकाणी भाजपला मोठं यश मिळालं, भाजपची सत्ता आली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला इंधन बचतीचं आवाहान केलं आहे. यावर बोलताना शरद पवार यांनी सरकारला दोन प्रश्न विचारले आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर मोदींनी सर्व निर्णय घेतले, इंधन बचतीचा निर्णय घ्यायला इतका वेळ का लागला? निवडणुकीतून जनतेमध्ये जागृती करावी असा विचार का नाही आला? असा सवाल शरद पवार यांनी सरकारला केला आहे. तसेच उद्या सीएम मंत्रालयात बाईकने आल्यास लोक गांभीर्याने घेतील, असंही यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.
