Maharashtra Political News LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर मराठीतून टीका
Maharashtra Political News LIVE in Marathi: आज 8 एप्रिल 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

महायुतीमधील काही जागांचा तिढा अजून सुटत नाहीय. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थतता वाढत चालली आहे. नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागा त्याच उदहारण आहेत. या दोन्ही लोकसभा मतदारसंघात अजून उमेदवारी जाहीर झालेली नाही. मात्र उमेदवारी गृहीत धरुन प्रचाराला सुरुवात केलेली आहे. दरम्यान शिवसेनेचा धाराशिव येथील शिंदे गट आक्रमक झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते मुंबईकडे निघाले आहेत. वर्षा बंगल्यावर शक्तीप्रदर्शन करणार आहेत. धाराशिव येथील लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीला दिल्याने शिंदे गट आक्रमक झाला आहे. मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या नेतृत्वात शिवसैनिक मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
LIVE NEWS & UPDATES
-
धाराशिवचा शिंदे गट आक्रमक
शिवसेनेचा धाराशिव येथील शिंदे गट आक्रमक झाला आहे. धाराशिवचे शिंदे गटाचे कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मुंबईतून आता ठाण्यात पोहचले आहेत. धाराशिव लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला दिल्याने शिंदे गट आक्रमक झाला आहे. मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या नेतृत्वात शिवसैनिक मुख्यमंत्री यांना आज ठाण्यात भेटणार आहेत.
-
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दुर्गंधीने नागरीक हैराण
पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी येथील उड्डाणपुलावर ट्रेलरचा टायर फुटल्याने पलटी झाला. यामुळे ट्रेलरमधील कचरा सर्व्हिसरोडवर पसरल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. मुंबईहून गुजरात वाहिनीने ट्रेलरमध्ये कचरा भरून वाहतूक केली जात होती. महामार्गावर सध्या सिमेंट काँक्रीटचे व्हाईट टॉपिंगचे काम जोरात सुरु असून टायर फुटून अपघात होत आहेत. सर्व्हिस रोड आणि महामार्गावर कचरा पसरल्याने दुर्गंधीने स्थानिक हैराण झाले आहेत. -
-
“कडु कारळं तुपात तळलं, साखरेत घोळले तरी कडूच”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपुरातील सभेत काँग्रेसवर मराठीतून टीका केली आहे. मोदींनी कडु कारळ्याचं उदाहरण देत काँग्रेसवर हल्लाबोल केला. कडु कारळं तुपात तळलं, साखरेत घोळले तरी कडूच, हे उदाहरण काँग्रेससाठी तंतोतंत लागू पडतं असं मोदींनी म्हटलं. तसेच काँग्रेसने देशातला जनाधार गमावला. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लिम लीगची भाषा आहे, असं म्हणत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
-
PM Modi Live : मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
पंतप्रधान नंरेद्र मोदी यांनी चंद्रपुरातील सभेतून इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विरोधकांनी फक्त परिवाराचाच विकास केला. विरोधकांनी विकासकामांना सातत्याने विरोध केला. मात्र आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा योजना सुरु केल्या, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
-
PM Modi Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपुरातून लाईव्ह
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपुरात महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या सभेत मराठीतून सुरुवात केली. मोदी यांनी यावेळेस फिर एक बार मोदी सरकार; चंद्रपुरकरांनी मन बनवलं आहे, असं म्हटलं. तसेच चंद्रपुरातील लाकडांचा वापर करुन राम मंदिर बनववल्याचा उल्लेख केला. तसेच मोदींनी गुढीपाडव्याचा शुभेच्छा दिल्या.
-
-
शिंदेकडून नरेंद्र मोदी यांचा यशस्वी पंतप्रधान असा उल्लेख
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांचा यशस्वी पंतप्रधान असा उल्लेख केला आहे. मुख्यमंत्री शिंदे चंद्रपुरात महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारसभेत बोलत आहेत. या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सभास्थळी आगमन झालं आहे. मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी मोदीही मैदानात उतरले आहेत.
-
मणिपूरमधील विस्थापितांच्या मतदानाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
मणिपूरमधील 18,000 अंतर्गत विस्थापित लोकांना मतदान करण्याच्या सूचना देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याचिकेवर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले की, अशी घाई नाही. आम्ही तारीख देऊ आणि याचिकेवर सुनावणी करू.
-
माझे रक्त निघाले तर तेही भाजप-भाजप म्हणेल: अनिल विज
हरियाणाचे माजी गृहमंत्री अनिल विज यांनी पक्षावर नाराज आहे का, या प्रश्नावर स्वतःला भाजपचे कट्टर भक्त असल्याचे सांगितले आहे. मीही मोदींचा परिवार आहे, माझे रक्त बाहेर पडेल आणि त्यालाही भाजप-भाजपच म्हणावे लागेल, असे ते म्हणाले. मी अंबाला कॅन्टोन्मेंटमध्ये सतत प्रचार करत आहे आणि त्याचे चांगले परिणाम मिळतील. सीएम हाऊसमध्ये संध्याकाळी बोलावलेल्या बैठकीबाबत अनिल विज म्हणाले की, मला निमंत्रण मिळाले आहे, जायचे की नाही याचा विचार केला जाईल.
-
जल, जंगल आणि जमिनीवर आदिवासींचा पहिला हक्क : राहुल गांधी
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल सिवनी येथे पोहोचले आहेत. सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, देशाची जमीन, पाणी, जंगल आणि संपत्तीवर तुमचा पहिला हक्क आहे. हा विचारधारेचा लढा आहे. देशात तुमचे स्थान कुठे असावे यासाठी हा तुमचा लढा आहे.
-
जोपर्यंत गाव, पंचायत, जिल्ह्याचा विकास होत नाही तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही : तेजस्वी यादव
बिहारमधील गया येथे आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी सभा घेतली. ते म्हणाले की, लोक म्हणतात ही देशाची निवडणूक आहे, आम्ही त्यांना विचारतो की, गावात, जिल्ह्याचा, राज्यात विकास होणार नसेल तर देशाचा विकास कसा होणार. गाव, पंचायत आणि जिल्ह्याचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही.
-
शरद पवार घेणार रावेर लोकसभा मतदारसंघाचा आढावा
शरद पवार रावेर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत.रोहिणी खडसे, रविंद्र भैय्या पाटील आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी मोदी बागेत दाखल झाले आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवर आज शिक्कामोर्तब होणार आहे.
-
नवरात्रीच्या मुहूर्तावर भाजप जाहीरनामा प्रसिद्ध करणार
नवी दिल्ली : येत्या आठवड्यात भाजप जाहीरनामा प्रसिद्ध करणार. उद्यापासून उत्तर भारतात चैत्र नवरात्री सुरु होणार. नवरात्रीच्या मुहूर्तावर भाजप जाहीरनामा प्रसिद्ध करणार
-
आप नेते दुर्गेश पाठक यांना ED च समन्स
आम आदमी पक्षाचे आमदार दुर्गेश पाठक यांना अंमलबजावणी संचालयनालयाने समन्स पाठवले आहे. कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी हे समन्स पाठवले आहे. त्यांना आज ED चौकशीला बोलावले. या प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आधीच अटक झाली आहे.
-
लोकसभा निवडणुकीसाठी ढोलताश्यांचे दर
लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने ढोलताश्यांचा दर ठरवून दिला आहे. ढोलताशे आठ हजार तर फेटा शंभर रुपयाला असणार आहे. टोपी २० रुपया पर्यंतचीच खरेदी करावी लागणार आहे. जेवणाचा दर १४० रुपये थाली आहे. बदाम,काजू आणि डाळिंबाचा दर देखील आयोगाने ठरवून दिला आहे. पोहे ४० रुपये प्रति प्लेट असणार आहेत.
-
योगी आदित्यनाथ यांची वर्धा हिंगणघाटमध्ये सभा
वर्ध्याच्या हिंगणघाट येथे आज उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा आयोजित आहे. योगी आदित्यनाथ यांची वर्धा जिल्हयातील पहिलीच सभा आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित आहे.
-
मावळमध्ये आरपीआयचा बहिष्कार
मावळ लोकसभेची उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील आणि उदय सामंतांच्या उपस्थित सुरू असलेल्या महायुतीच्या समन्वय बैठकीवर रामदास आठवले यांच्या आरपीआय गटाने बहिष्कार टाकला. मंचावर स्थान न दिल्यानं बैठकीतून आरपीआय गट बाहेर पडला.
-
छत्रपती संभाजीनगर शहरात शिंदे गट शिवसेनेची बैठक सुरू
छत्रपती संभाजीनगर शहरात शिंदे गट शिवसेनेची बैठक सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक सुरू आहे. बैठकीला पालकमंत्री संदीपान भुमरे, आमदार संजय शिरसाठ यांच्यासह तीनही जिल्हाध्यक्ष उपस्थित आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट शिवसेनेची रणनिती आज ठरणार आहे.
-
विजय वडेट्टीवार हे लोकसभा निवडणूक झाल्यावर स्वतः भाजपमध्ये प्रवेश करणार- रवी राणा
अमरावती- विजय वडेट्टीवार हे लोकसभा निवडणूक झाल्यावर स्वतः भाजपमध्ये प्रवेश करणार. आता वक्तव्य करून ते काँग्रेसच्या लोकांची दिशाभूल करत आहेत. विजय वडेट्टीवार यांचा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय झालेला आहे. विजय वडेट्टीवार यांनी त्यांचा इतिहास जरा उघडून बघावा ते कुठून आणि आले कुठे गेले. आम्ही कुठल्याही दिशेने राहो, जनता आमच्यासोबत राहते, असं रवी राणा म्हणाले.
-
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाला खिचडी घोटाळा- निरुपम
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हा खिचडी घोटाळा झाला. अमोल किर्तीकरच नाही तर संजय राऊतही खिचडी चोर आहेत. सह्याद्री रिफ्रेशमेंट कंपनीद्वारे हा घोटाळा झालाय, असा आरोप निरुपम यांनी केला.
-
राऊतांच्या कुटुंबाने एकूण एक कोटी रुपयांची दलाली घेतली- निरुपम
संजय राऊत यांनी मुलीच्या नावाने चेकद्वारे लाच घेतली. राऊतांच्या कुटुंबाने एकूण एक कोटी रुपयांची दलाली घेतली. खिचडी चोरांविरोधात कारवाई झालीच पाहिजे. राऊतांच्या भावाच्या खात्यातही सहा लाख रुपये जमा झाले होते, असे आरोप संजय निरुपम यांनी केले आहेत.
-
संजय राऊत हे खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार- संजय निरुपम
संजय राऊत हे खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत. मुलगी, भाऊ आणि पार्टनरच्या नावावर राऊतांनी पैसे घेतले, असा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.
-
Live Update | देशात सर्वात वाईट स्थिती आजमितीला शेतकरी वर्गाची आहे – शरद पवार
देशात सर्वात वाईट स्थिती आजमितीला शेतकरी वर्गाची आहे… सत्ताधारी लोकांना शेतकऱ्यांची आस्था राहिली नाही… भारताबाहेर कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने सरकारने निर्यात बंदी केलीय… मोदी सरकार हे दुहेरी भूमिका घेणारे… असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.
-
Live Update | सांगलीत राऊतांनी विरोधात बोलायला नको होतं – विशाल पाटील
संजय राऊत सांगलीत येऊन विरोधात बोलले, त्यांच्या मनात खंत… सांगलीची लढाई विश्वजीत कदम यांच एकट्याची नव्हती… विश्वजीत कदम आमच्या सर्वांसाठी लढत आहेत… राऊतांची वक्तव्य युतीधर्माला न शोभणारी… असं वक्तव्य विशाल पाटील यांनी केलं आहे.
-
Live Update | गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर फुलांच्या दरात 40 टक्क्यांनी वाढ
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर फुलांच्या दरात 40 टक्क्यांनी वाढ… कल्याण फुल मार्केटमध्ये शेवंती, अस्टर 250 रुपयांवर… फुलांच्या किंमती वाढलेल्या असताना कडक उन्हामुळे फुल कोमेजून जात आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे…
-
Live Update | देशातील मतदारांनी मोदींना पंतप्रधान करण्याची गॅरेंट घेतली – एकनाथ शिंदे
देशातील मतदारांनी मोदींना पंतप्रधान करण्याची गॅरेंट घेतली… विदर्भातील उमेदवार मोठ्या मतांनी जिंकतील… विदर्भात महायुतीमय वातावरण झालं आहे… असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
-
के कविता यांच्या जामीनाबाबत महत्वाची बातमी
BRS नेत्या के कविता यांना दिलासा नाहीच… के कविता यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. कविता यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होता येणार नाही. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर BRS ला मोठा झटका बसला आहे.
-
खान्देशात १४ लाख गाठींची खरेदी
आतापर्यंत खान्देशात १४ लाख गाठींची खरेदी झाली. गेल्या वर्षाच्या तुलनेतही खान्देशात २ लाख गाठींची यंदा तूट झाली आहे. खानदेशात पावसाचा खंड बोंड, अळीचा प्रादुर्भाव यामुळे कापसाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. २० लाख गाठींचे उद्दिष्ट होते. ६ लाख गाठींची घट झाली आहे. खान्देश जिनिंग असोसिएशनच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे.
-
अखिल भारतीय मराठा महासंघाचा महायुतीला पाठिंबा
अखिल भारतीय मराठा महासंघाने महायुतीला पाठींबा जाहीर केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला आहे. राज्य सरकारने मराठा समाजासाठी केलेल्या कामांमुळे पाठिंबा दिल्याची माहिती आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रमुख पदाधिकारी लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत. अखिल भारतीय मराठा महासंघ राज्यात महायुतीच्या प्रचारात उतरणार आहे.
-
शरद पवार बारामती दौऱ्यावर
शरद पवार सध्या बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी ते स्थानिकांशी संवाद साधत आहेत. माझ्या कामाची सुरुवात जिरायत भागापासून झाली. जिरायत भाग आणि दुष्काळाचे नाते कायमचे होते. गावोगावी रोजगार हमी कामे आणि बंधारे बांधण्यास सुरवात केली. भैरवनाथ शिक्षण मंडळाला माझं नाव मला आता समजलं. देशात अनेक मंत्रीपदे भूषवली. सर्वात आनंद हा 10 वर्षे कृषिमंत्री झाल्यानंतर झाला, असं शरद पवार म्हणाले.
-
लोणावळा – बंगल्यात बेकायदेशीर साउंड सिस्टम लावून मुलींकडून अश्लील नृत्य करून घेणाऱ्या वर कारवाई
लोणावळा – बंगल्याच्या प्रांगणात रात्री उशिरापर्यंत बेकायदेशीर साउंड सिस्टम लावून मुलींकडून अश्लील नृत्य करून घेणाऱ्या आणि नृत्य करणाऱ्या नृत्यांगनावर लोणावळा पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी लोणावळा पोलिसांनी नऊ जणांविरोधात कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं.
-
रात्रीचा प्रवास असुरक्षितच, रेल्वे पोलिस महासंचालक कार्यालयाच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
रात्रीचा प्रवास असुरक्षितच असल्याचा निष्कर्ष एका रेल्वे पोलिस महासंचालक कार्यालयातर्फे केलेल्या महिला प्रवासी सर्वेक्षणातून समोर आला आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत महिलांच्या रेल्वे प्रवासाबाबत सुरक्षा यंत्रणांना गंभीरपणे विचार करायला लावणारे वास्तव सर्वेक्षणातून अधोरेखित झाले.
रेल्वे पोलिस महासंचालक कार्यालयाने मुंबई उपनगरी रेल्वेतील महिला प्रवाशांचे अनुभव, समस्या, शिफारशी याबाबत आढावा घेण्यासाठी प्रवासी सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. 1 ते 31 मार्च कालावधीत महिला सर्वेक्षण पार पडले. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत 21 ऑनलाइन प्रश्नावलीच्या सर्व्हेमध्ये जवळपास 3 हजार महिला प्रवाशांनी सहभाग घेतला
-
खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये ईडीकडून ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकर यांची चौकशी
खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये ईडीकडून ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकर यांची चौकशी होणार. थोड्याच वेळात कीर्तीकर आपल्या निवासस्थानाहून ईडी कार्यालयाकडे निघतील. ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स अमोल कीर्तीकर यांना पाठवण्यात आले आहे
मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सप्टेंबर महिन्यामध्ये याच कठीण खिचडी घोटाळा प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केल्या नंतर या सगळ्याचा तपास ईडी कडून केला जात आहे. यात खिचडी घोटाळा प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांना ईडी कडून अटक करण्यात आली आहे. कीर्तीकर यांना मुंबई उत्तर पश्चिम मधून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
-
नवी दिल्ली – BRS नेत्या के कविता यांच्या जामीन अर्जावर राउज ॲव्हेन्यू कोर्ट आज देणार निकाल
नवी दिल्ली – BRS नेत्या के कविता यांच्या जामीन अर्जावर राउज ॲव्हेन्यू कोर्ट आज निकाल देणार .
कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी के कविता अटकेत आहेत . कविता यांच्या जमीन अर्जाला ED ने विरोध केला आहे.
कोर्ट काय निकाल देत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
Maharashtra News : लोकसभेची जबाबदारी मंत्री अतिशी यांच्याकडे
आसाम राज्यात लोकसभेची जबाबदारी मंत्री अतिशी यांच्याकडे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अनुपस्थितीत आम आदमी पक्षाची धुरा सांभाळणार मंत्री अतिशी. आजपासून आतिशी तीन दिवस आसाम राज्याच्या दौऱ्यावर. तीन लोकसभा मतदारसंघात आम आदमी पक्षाचे उमेदवार.
-
Maharashtra News : कचऱ्याच्या डोंगराला भीषण आग
तामिळनाडूत कोइंबतूरमध्ये कचऱ्याच्या डोंगराला भीषण आग. शहरातला कचरा डम्पिंगला भीषण आग. आग विझवण्यासाठी तब्बल 300 गाड्या. घटनास्थळी प्रचंड मोठ्या धुराचे लोट.
-
Maharashtra News : महाराष्ट्राचा पुन्हा झाला टॅंकरवाडा
राज्यात 1858 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू. सर्वाधिक टँकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात. जालना जिल्हा टँकरच्या संख्येत दुसऱ्या नंबरवर. मराठवाड्यात सर्वाधिक टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातही टँकरची संख्या जास्त आहे.
संभाजीनगर 443
जालना 321
अहमदनगर 110
सांगली 96
पुणे 98
बीड 117
धाराशिव 63
बुलढाणा 32
सोलापूर 42
जळगाव 68
सातारा 157
-
Maharashtra News : धाराशिवच्या जागेवरुन महायुतीमध्ये तणाव
शिवसेनेचा धाराशिव येथील शिंदे गट आक्रमक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते मुंबईकडे निघाले. वर्षा बंगल्यावर करणार शक्तीप्रदर्शन. धाराशिव येथील लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीला दिल्याने शिंदे गट आक्रमक. मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या नेतृत्वात शिवसैनिक मुख्यमंत्र्यांना भेटणार. राजीनामा सत्रानंतर शिंदे गट मुंबईत जाऊन करणार शक्तीप्रदर्शन. भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यांना दिली आहे उमेदवारी. उमेदवारीला शिवसेना शिंदे गटाचा विरोध.
Published On - Apr 08,2024 7:50 AM
