महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह गारपीट, आंबा-केळी-द्राक्ष बागांचे नुकसान, वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू
जालना जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीट झाल्यामुळे फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नागपूरमध्ये शनिवारपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाचा तडाखा सोमवारी कायम राहिला. सलग तिसऱ्या दिवशी नागपूर शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली.

महाराष्ट्रातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. विदर्भात या पावसाने शेतीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. त्यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात अवकाळी पाऊस झाला. सोमवारी जळगाव तालुक्यासह जामनेर, पारोळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. अमरावती जिल्ह्यात विजेच्या कडकडासह गारपीट झाली आहे. मेळघाटातमध्ये वीज कोसळून दोन जण ठार झाले आहे. तसेच चार जण जखमी झाले आहे. चुणीलाल सावरकर (वय 45) व सुरेश जामूनकर (वय 45) या दोघांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव जिल्हयात अनेक तालुक्यांमध्ये सोमवारी रात्री अचानक वातावरणात बदल झाला. त्यानंतर अवकाळी पाऊस सुरु झाला. दिवसभर कडाक्याचे ऊन अन् रात्रीच्या वेळी वादळी वारा तसेच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. प्रचंड वेगाने असलेल्या वादळी वाऱ्यामुळे दाणादाण उडाली. त्यानंतर अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाला. या अवकाळी पावसामुळे शेतात कापून ठेवलेल्या मका, बाजरीसह विविध पिकांचे नुकसान झाले.
मराठवाड्यात अनेक भागांत गारपीट
जालना जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये सोमवारी सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीट झाल्यामुळे फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. जालनामधील बदनापूर तालुक्यात वादळी वाऱ्याच्या पावसाचा जोर अधिक होता. या पावसामुळे द्राक्ष बागांबरोबर केसर आंब्याच्या बागांचे नुकसान झाले. गारपिटीमुळे गारांचा खच बागेत पडला होता. परभणीच्या सेलू तालुक्यातील हिस्सी येथे अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत कापूससह कडबा जळाला आहे.
अंबाजोगाई शहरासह परिसरात गारासह वादळी पाऊस झाला. अचानक पडलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. नांदेडमध्ये वादळी वाऱ्यामुळे केळी बागाचे नुकसान झाले. या वादळी वाऱ्यामुळे नांदेडच्या अर्धापूर मुदखेड या तालुक्यातील केळी बागेचे प्रचंड नुकसान झाले आहे. केळीच्या बघा आडव्या झाल्या आहेत. अनेक केळी उत्पादक शेतकऱ्यांची केळी काढणीला आली होती. परंतु अचानक वादळी वाऱ्यामुळे आलेल्या पावसाचा केळीच्या बागेला मोठा फटका बसला.
नागपूरमध्ये शनिवारपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाचा तडाखा सोमवारी कायम राहिला. सलग तिसऱ्या दिवशी नागपूर शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली. तसेच काही भागात गाराही पडल्या. पावसाळी वातावरणामुळे दिवस रात्रीचे तापमान पुन्हा खाली घसरले आहे. दिवसाचे कमाल तापमान 4.3 अंशाने घसरून 38.4 अंशांवर आले आहे. नागपुरात 10 मेपर्यंत अवकाळी पावसाची परिस्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
