Sanjay Raut : मोदींना अपमानित करण्यासाठीच शाहांनी विधेयक आणलं? संजय राऊत यांचा खळबळजनक सवाल
लोकसभेत महिला आरक्षण विधेयक (नारी शक्ती वंदन विधेयक) नामंजूर झाल्याने केंद्राला धक्का बसला आहे. यावरून संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. राऊतांच्या मते, महिलांना आरक्षण देण्याचा सरकारचा मूळ हेतू नव्हता, तर सत्तेसाठी जागा वाढवण्याचे हे 'ढोंग' आणि 'षडयंत्र' होते. त्यांनी भाजपचा मुखवटा फाडत हे महिलांच्या नावावरचे 'शोषण' असल्याचे म्हटले.

लोकसभेत शुक्रवारी केंद्र सरकारने महिला आरक्षण अर्थात नारी शक्ती वंदन विधेयक मांडलं. पण पुरेस बहुमत नसल्याने हे विधेयक नामंजूर झालं. हा सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मात्र विरोधाकांनी याच मुद्यावरून सरकारवर टीकास्त्र सोडलं असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार, संजय राऊत यांनीही सरकारचा समाचारा घेत खडे बोल सुनावले.
आरक्षणाच्या नावाखाली भोंदू बिल
‘मोदी है तो मुमकीन है’ ही आता दंतकथा झाली, आता फारतर ‘ मोदी है तो नमकीन है’ असं म्हणता येईल. हे नमकीन नमकीन भाषण करतात, आणि त्यांचीच लोकं जीभ चाटत टाळ्या वाजवतात. जे बिल अमित शहांनी आणलं, ते बहुतेक नरेंद्र मोदींना अपमानित करण्यासाठी आणलं की काय . दोन तृतीयांश मेजॉरिटी जमा करू शकत नाही, भारतीय जनता पक्षाकडे स्वत:चं बहुमत नाही. अशा वेळेला महिला आरक्षणाच्या नावाखाली एक भोंदू बिल, लोकसभेत आणलं , त्यांचा मूळ उद्देश हा महिलांना आरक्षण वगैरे देण्याचा अधिकार, हक्क, भावना असा काही नव्हता. तर 543 जागा वाढवून फक्त 850 करायच्या आणि सत्तेचा अमरपट्टा कायम बांधून सतत विजय प्राप्त करत रहायचं, याशिवाय अमित शाह आणि त्यांच्या लोकांचा कोणताही हेतू नव्हता, अशी घणाघाती टीका राऊतांनी केली.
पुरूष वि. महिला असा संघर्ष पेटवायचा होता
बेकायदेशीर पद्धतीने विजय मिळवण्याच्या संदर्भातलं हे बिल होतं. डिलीमीटेशन बिल फॉर अनफेअर व्हिक्टरी… महिलांच्या नावाखाली 850 जागा वाढवायच्या यापेक्षा दुसरा कोणताही हेतू नव्हता. या निमित्ताने देशामध्ये उत्तर वि.दक्षिण असा संघर्ष पेटवायचा होता. या निमित्ताने त्यांना पुरूष वि. महिला असा संघर्ष पेटवायचा होता. आम्हीच महिलांचे एकमेव तारणहार हा नॅरेटिव्ह त्यांना या निमित्ताने सेट करायचा होता असा आरोपी राऊतांनी केला.
जर ते खरोखरचं महिलांचे तारणहार असतील 2023 ला जे महिला आरक्षण विधेयक आम्ही सर्वांनी मंजूर केलं, त्यातल्या 543 जागांमध्ये मोदींनी महिलांना 33 टक्के आरक्षण द्यायला काहीच हरकत नव्हती, आमची सर्वांची तयारी होती. उद्धव ठाकरेंनी त्यांना पाठिंबा दिला असता, सगळ्यांनी पाठिंबा दिला असता. पण ते न करता भाजपातील पुरूष खासदार, पुरूष नेत्यांच्या जागा वाचायला पाहिजेत, यासाठी 850 जागा करण्याचं हे षडयंत्र होतं, ते संसदेमध्येच लोकशाही मार्गाने उधळून लावलं. हे ढोंग आणि महिलांच्या नावावरची भोंदूगिरी, शोषण भाजप करत होतं. त्याचा आम्ही पर्दाफाश केला, अशा शब्दांत राऊतांनी सरकारला फटकारलं.
