ट्रेनमध्ये आग लागल्याची अफवा, प्रवासी रुळांवर उतरले अन् दुसऱ्या ट्रेनखाली चिरडले..4 जणांचा मृत्यू
रविवारी संध्याकाळी मध्य प्रदेशातील मुरैना येथे एक भीषण अपघात घडला. उदयपूर इंटरसिटी एक्सप्रेस ट्रेनला आग लागल्याची खोटी अफवा पसरल्याने घाबरलेले प्रवासी थेट रुळांवर उतरले आणि त्याच वेळी शेजारील ट्रॅकवरुन ट्रेन आल्याने हा अपघात घडल्याचे म्हटले जात आहे.

मध्य प्रदेशच्या मुरैना येथे उदयपूर इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये आग लागण्याची अफवा पसरुन प्रवासी घाबरुन ट्रॅकवर उतरल्याने शेजारील ट्रॅकवरुन त्याच वेळी आलेल्या दुसऱ्या ट्रेनच्या खाली चिरडल्याची दुर्घटना घडली आहे. यात अपघातात चारहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
मुरैना जिल्ह्यात उदयपूर इंटरसिटी एक्सप्रेस हेतमपूर स्थानकाच्या जवळ असताा ट्रेनच्या आत आग लागल्याची अफवा पसरली. प्रवाशांनी त्यामुळे घाबरुन ट्रेनच्या बाहेर उड्या मारल्या आणि ते रेल्वे ट्रॅकवर आले. मात्र, याच वेळी शेजारील रुळांवरुन पाताळकोट एक्सप्रेस वेगाने आल्याने ट्रॅक उभ्या असलेल्या प्रवाशांना धडक बसल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना इतकी वेगाने अचानक घडली की कोणा काही कळण्याआधीच जागीच प्रवासी ठार झाले. या घटनेने घटनास्थळी किंकाळ्या आणि प्रवाशांच्या नातेवाईकांच्या आक्रोशाने परिस्थिती बिकट बनली. रेल्वे अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाने घटना स्थळी धाव घेतली आणि बचावाचे काम सुरु केले.
रेल्वेचे निवेदन: अलार्मची साखळी ओढल्यानंतर…
या भीषण अपघातानंतर उत्तर मध्य रेल्वेने मुरैना रेल्वे अपघातावर निवेदन जारी केले आहे. रेल्वेने म्हटलं की एका प्रवाशाने अलार्म चेन खेचल्याने खजुराहो-उदयपूर इंटरसिटी एक्सप्रेस जागीच थांबली. त्यामुळे काही प्रवासी ट्रेनमधून उतरले आणि नजिकच्या रुळांवर ते पोहचले तेव्हा पाताळकोट एक्सप्रेसने त्यांना धडक दिली. त्यामुळे चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची रेल्वेने चौकशी सुरु केली आहे.
मृतांची नावे
▪️ आफरीन (वय ३५)
▪️ आशद (वय ४)
▪️ शकुंतला (वय ६०)
▪️ वीरमा देवी (वय ५८)
महिला प्रवाशाने दिली माहिती…
“अचानक कोणीतरी ट्रेनची साखळी ओढली आणि ‘आग लागली, आग लागली,’ असे ओरडले.” त्यामुळे घाबरुन लोक तात्काळ ट्रेनमधून उतरू लागले. प्रवासी रेल्वे रुळ ओलांडत असतानाच, त्याच दिशेने पाटालकोट एक्सप्रेस येत होती. काही लोकांना तिची धडक बसली आणि हा अपघात घडला. या अपघातात एक संपूर्ण कुटुंब होते. त्या कुटुंबात पती, पत्नी आणि त्यांची दोन मुले होती.
