इराण-इस्रायल युद्धामुळे भारतीयांच्या खिशाला लागणार कात्री, काय महागणार?
अमेरिका-इराण-इस्रायल संघर्षाचा भारतावर मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. सध्या सुक्या मेव्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे पुरवठा ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या तीव्र संघर्षाचे पडसाद आता भारताच्या अर्थकारणावर उमटू लागे आहेत. तसेच याचा परिणाम आता थेट सामान्य नागरिकांच्या खिशाला बसण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. या भू-राजकीय तणावामुळे भारताची सुक्या मेव्याची (Dry Fruits) आयात साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ड्रायफूटच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. तर दुसरीकडे, कच्च्या तेलाच्या जागतिक दरात होणाऱ्या चढ-उतारामुळे देशांतर्गत पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सुक्या मेव्याच्या दरात ऐतिहासिक वाढ
मुंबईतील एपीएमसी वाशी, क्रॉफर्ड मार्केट, मस्जिद बंदर आणि मालाड यांसारख्या मोठ्या होलसेल आणि रिटेल बाजारपेठांमध्ये सुक्या मेव्याच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार युद्धाच्या परिस्थितीमुळे मालाचा पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे ड्रायफूटच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. काही ठिकाणी आयात माल २० ते ३० टक्के, तर काही ठिकाणी दर दुप्पट झाले आहेत.
भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे पूर्वीच वाघा बॉर्डर बंद आहे. अफगाणिस्तानातून येणारा माल इराणमार्गे (चाबहार बंदर) भारतात येत होता. आता इराणमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा मार्गही बंद पडल्याने पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
सध्या ड्रायफूटच्या किमती गगनाला भिडल्यामुळे ग्राहकांनी खरेदी कमी केली आहे. किलोभर सुकामेवा घेणारे ग्राहक आता पाव किलो ड्रायफूट खरेदी करत आहेत. यामुळे बाजारातील विक्रीत तब्बल ५० टक्क्याने घट झाली आहे. याचा फटका मिठाईवाले, हॉटेल्स, बेकरी आणि केटरिंग व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर बसला आहे. सध्या लग्नसराईच्या हंगामात सुक्या मेव्याचा तुटवडा आणि दरवाढ कायम राहण्याची शक्यता आहे.
पेट्रोल-डिझेल दरावर काय परिणाम?
जागतिक तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत अस्थिरता पाहायला मिळत आहे. ज्यामुळे पेट्रोल दरवाढीची चर्चा सुरू आहे. मात्र, मुंबई आणि आसपासच्या उपनगरातील पेट्रोल पंपांवर अद्याप दर स्थिर आहेत. मुंबईत सध्या पेट्रोलचा दर १०३.५० प्रति लीटर इतका आहे. अद्याप तेल कंपन्यांनी किरकोळ दरात कोणताही बदल केलेला नाही, ज्यामुळे वाहनचालकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात तणाव कायम राहिल्यास इंधनाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
