मुख्यमंत्र्यांनी सस्पेन्स वाढवला, एकाच गाडीतून दिग्गजांचा प्रवास, पडद्यामागे जोरदार हालचाली, मोठी घोषणा होणार?
महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे जोरदार हालचाली घडत आहेत. महायुतीत मुंबईतील दोन जागांचा तिढा आज सुटला आहे. त्यानंतर आता नाशिक आणि ठाण्याच्या जागेचा तिढा कायम आहे. असं असताना आता मुख्यमंत्र्यांच्या एका वृत्ताने याबाबतचा सस्पेन्स वाढला आहे. पण उद्या संध्याकाळपर्यंत याबाबतचं चित्र पूर्ण स्पष्ट होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबतचा सस्पेन्स वाढवला आहे. शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतील दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. मुंबई वायव्यसाठी रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर दक्षिण मुंबईसाठी यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यानंतर नाशिक आणि ठाण्याच्या जागेचा सस्पेन्स कायम आहे. विशेष म्हणजे नाशिक आणि ठाण्यात आता राजकीय घडामोडींना प्रचंड वेग देखील आलेला आहे. दोन्ही ठिकाणी पडद्यामागे राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आलेल्या एका वृत्ताने महाराष्ट्राच्या राजकारणाबाबतचा सस्पेन्स वाढला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या (1 मे) सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषद बोलवली आहे. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री नेमकी काय घोषणा करणार, काय भूमिका मांडणार? याबाबतचा सस्पेन्स वाढला आहे.
नाशिकमध्ये जोरदार हालचाली
महायुतीत नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा काही केल्या सुटताना दिसत नाही. विशेष म्हणजे नाशिकच्या जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही जवळ आली आहे. त्यामुळे महायुतीला हा तिढा सोडणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे त्या पार्श्वभूमीवर आता नाशिकमध्ये घडामोडी देखील घडताना दिसत आहेत. भाजपचे संकटमोचक नेते मंत्री गिरीश महाजन हे आज नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी नाशिकमध्ये आज शिंदेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची भेट घेतली आहे. तसेच त्यांना शांतिगिरी महाराजांचीदेखील भेट घेतली आहे. त्यानंतर त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांचीदेखील भेट घेतली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील आज नाशकात आले आहेत. त्यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना नाशिकच्या जागेबाबत मोठी घोषणा केली आहे. भाजप नाशिकच्या जागेबाबतचा दावा सोडत असल्याची घोषणा बावनकुळे यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चा करुन नाशिकच्या जागेबाबत निर्णय घ्यावा, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. त्यामुळे नाशिकच्या जागेबाबत आता ट्विस्ट निर्माण झालाय.
ठाण्यात दिग्गज नेत्यांचा एकाच गाडीने प्रवास
विशेष म्हणजे ठाण्यात देखील जोरदार घडामोडी घडत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्याच्या जागेचा तिढा उद्या सकाळपर्यंत सुटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी आज सायंकाळी शिवसेना नेते रवींद्र फाटक आणि प्रताप सरनाईक हे एकाच गाडीतून गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. रवींद्र फाटक आणि प्रताप सरनाईक हे ठाणे लोकसभेच्या उमेदवारीच्या स्पर्धेतले नेते आहेत. गेल्या काही दिवसात प्रताप सरनाईक आणि आमदार रवींद्र फाटक यांनी संपूर्ण लोकसभा मतदारसंघ पिंजायला सुरुवात केली आहे. त्यांनी अनेक ठिकाणी महायुतीचे मेळावे देखील घेतले आहेत. ठाण्याच्या जागेवर आता कोणाची वर्णी लागते? याकडे सर्वांचे लक्ष आहे.