T20 WC : अभिषेक शर्मा फिट व्हावा यासाठी पाकिस्तानची प्रार्थना! सलमान आगाने सांगितलं कारण…
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्मा खेळावा यासाठी भारतीय क्रीडाप्रेमी मनापासून प्रार्थना करत आहेत. दुसरीकडे, पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा तसंच काहीसं मनात ठेवून आहे. पण त्याचं कारण काही वेगळं आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाची विजयी घोडदौड सुरू आहे. भारताने पहिल्या सामन्यात अमेरिकेला आणि दुसऱ्या सामन्यात नामिबियाला पराभूत केलं. आता भारतासमोर पाकिस्तानचं आव्हान आहे. असं असताना अभिषेक शर्मा या सामन्यात खेळणार की नाही? याबाबत साशंकता आहे. मागच्या सामन्यापूर्वी त्याला पोटात गडबड झाल्याने रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यानंतर डिस्चार्ज मिळाला पण नामिबियाविरुद्धच्या सामन्यात खेळला नाही. त्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने पुढच्या दोन तीन सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे, असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे क्रीडाप्रेमींची चिंता वाढली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी फिट अँड फाईन व्हावा अशी इच्छा भारतीय क्रीडाप्रेमींची आहे. आता अशीच इच्छा पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने व्यक्त केली आहे. त्याने सांगितलं की, भारताने आपली सर्वश्रेष्ठ प्लेइंग मैदानात उतरवावी, यात अभिषेक शर्माही असावा.
पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने सांगितलं की, आशा आहे की उद्या अभिषेक शर्मा खेळेल. त्याची तब्येत सुधारत आहे. आम्ही सर्वोत्कृष्ट संघाविरुद्ध खेळू इच्छित आहोत. आमची अभिषेक शर्मा खेळावा अशीच इच्छा आहे. मग पाकिस्तानसमोर आव्हान वाढलं तरी काही हरकत नाही. अभिषेक शर्मा जगातील सर्वात घातक फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याच्या रडारमध्ये गोलंदाज आला तर त्याची काही खैर नसते. अभिषेककडे पावरप्लेमध्ये सामना संपण्याची ताकद आहे. आशिया कप स्पर्धेत याची अनुभूती पाकिस्तान संघाला आली आहे.
अभिषेक शर्माने पाकिस्तानविरुद्ध 31, 74 आणि 5 धावांची खेळी केली होती. या तिन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला होता. पण आता अभिषेक शर्माचं खेळणं कठीण आहे. कारण 7 फेब्रुवारीला अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात त्याला 103 ताप होता. त्यात पोटात गडबडही झाली होती. त्यामुळे रुग्णालयात दाखल केलं होतं. त्याचं वजनही कमी झालं असून नामिबियाविरुद्धच्या सामन्यात खेळला नाही.
पाकिस्तानचा संघ गेल्या दोन आठवड्यांपासून कोलंबोत आहे. त्यामुळे त्यांनी या वातावरणाशी बऱ्यापैकी जुळवून घेतलं आहे. त्यात दोन सामन्यात विजयही मिळवला आहे. त्यामुळे भारतासाठी पाकिस्तानचं आव्हान सोपं नसेल. त्यात फिरकीची भक्कम फळी पाकिस्तानकडे आहे. भारताला आणखी ताकदीने या सामन्यात उतरावं लागणार आहे.
