IND vs PAK : शाहिद आफ्रिदीचा भारत-पाक सामन्यावरुन दुतोंडीपणा, पोस्टमध्ये काय म्हणाला?
Shahid Afridi On India vs Pakistan Match : टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील सामना हा कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये नियोजित होता. मात्र सामन्याच्या 14 दिवसांआधी पाकिस्तान सरकारकडून या सामन्यावर बहिष्कार टाकण्यात आलाय.

आगामी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत 15 फेब्रुवारीला भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या हायव्होल्टेज सामन्याची क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा होती. मात्र पाकिस्तान सरकारने 1 फेब्रुवारीला टीम इंडिया विरुद्ध टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यात खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं. पाकिस्तानने टीम इंडिया विरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार घातला. पाकिस्तान सरकारच्या या भूमिकेवरुन सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याने या प्रकरणावरुन प्रतिक्रिया दिली आहे. आफ्रिदीने प्रतिक्रिया देत अकलेचे तारे तोडले आहेत. तसेच आफ्रिदीने केलेल्या या पोस्टवरुन तो कसा दुटप्पी आणि दुतोंडी आहे, हे स्पष्ट झालं आहे.
आफ्रिदीने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे थेट आयसीसीलाच प्रश्न केला आहे. तसेच आफ्रिदीने क्रिकेटमध्ये राजकारणाच्या शिरकावाबाबतही भाष्य केलं. आफ्रिदी आयसीसीला उद्देशून काय म्हणालाय? हे जाणून घेऊयात.
आफ्रिदीची दुतोंडी भूमिका
“क्रिकेट द्वारं खुली करु शकतो, जेव्हा राजकारण ते बंद करतं, मी या मताचा आहे. तसेच पाकिस्तान टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडिया विरुद्ध खेळणार नाही ही पश्चातापाची बाब आहे, मात्र मला आमच्या सरकारचा निर्णय मान्य आहे”, असं म्हणत आफ्रिदीने पाकिस्तान भारताविरुद्ध खेळणार नसल्याबाबत पश्चाताप व्यक्त केला. तसेच सरकारच्या भूमिकेचं समर्थनही केलं.
आफ्रिदीला आयसीसीकडून काय अपेक्षित?
“तसेच आयसीसीने फक्त वक्तव्य न करता, पुढे येत नेतृत्व करुन निर्णय घेण्याची गरज आहे. आयसीसीने असं करुन ती कशी सर्वच सदस्य देशांच्या क्रिकेट संघांसाठी निष्पक्ष आणि स्वतंत्र आहे हे दाखवून द्यावं”, असं आफ्रिदी म्हणाला.
आफ्रिदीची पोस्ट व्हायरल
Ladies and Gentlemen Mr Shahid Afridi- Cousin of Shaquib Afridi, a commander of the terrorist group Harkat-ul-Ansar who was killed by the Indian forces in J&K India. pic.twitter.com/gL9oGwCTS1
— Meru (@MeruOnX) February 2, 2026
पाकिस्तान फक्त टीम इंडिया विरुद्धच खेळणार नाही
पाकिस्तान आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत फक्त टीम इंडिया विरुद्धच खेळणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. पाकिस्तान सरकारने 1 फेब्रुवारीला केलेल्या एक्स पोस्टमधून हे स्पष्ट केलं होतं. मात्र टीम इंडिया विरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्यामागील नेमकं कारण काय? हे पाकिस्तान सरकारने स्पष्ट केलं नाही.
पाकिस्तानचे साखळी फेरीत 3 सामने
दरम्यान पाकिस्तानचे आता साखळी फेरीत 3 सामनेच होणार आहेत. पाकिस्तानचा ए ग्रुपमध्ये समावेश आहे. पाकिस्तान आता टीम इंडिया विरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार घातल्यानंतर नेदरलँड्स, नामिबिया आणि यूएसए या 3 संघांविरुद्ध साखळी फेरीत खेळणार आहे. टी 20i स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. पाकिस्तानसमोर स्पर्धेतील पहिल्याच दिवशी नेदरलँड्सचं आव्हान असणार आहे.
