IND vs PAK: टीम इंडियासाठी धोक्याची घंटा! भारताच्या प्रशिक्षकांनी या सामन्याचं गणित सांगितलं
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना 15 फेब्रुवारीला होणार आहे. या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले भारत पाकिस्तान संघ आमनेसामने येणार आहे. पण या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक टेन डेस्काथे यांनी भारतीय संघाला धोक्याचा इशारा दिला आहे.

India vs Pakistan: भारताविरूद्धचा सामना खेळणार नाही या भूमिकेवरून पाकिस्तानने युटर्न घेतला आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान सामना नियोजित तारखेला होणार हे आता स्पष्ट झालं आहे. हा सामना 15 फेब्रुवारीला कोलंबोत होणार आहे. भारताची या स्पर्धेतील कामगिरी पाहता आणि मागच्या काही वर्षातील रेकॉर्ड पाहता बाजू भक्कम आहे. असं असताना टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्ष टेन डेस्काथे यांनी संघाला धोक्याचा इशारा दिला आहे. त्यांनी या सामन्यापूर्वी पाकिस्तानची जमेची बाजू बरोबर ओळखली आहे. त्यामुळे टीम इंडियाला या सामन्यातील विजय वाटतो तितका सोपा नाही. त्याचं कारणही टेन डेस्काथे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आतापासून धाकधूक लागून आहे. पण टीम इंडिया या स्थितीवरही मात करेल असा दृढ विश्वासही आहे.
टेन डेस्काथे यांनी सांगितलं की, ‘कोलंबोत सामना खेळणं आव्हानात्मक असू शकते. कारण पाकिस्तानचा संघ मागच्या दोन आठवड्यांपासून तेथे थांबला आहे. पण आमचा हेतू सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा आहे.’ डेस्काथे यांच्या म्हणणं क्रीडाप्रेमींना पटलं देखील आहे. कारण टीम इंडिया भारतात खेळून थेट श्रीलंकेला जाणार आहे. तिथल्या खेळपट्टीचा अंदाज भारतीय संघाला लगेच येणार नाही. पण भारताने पाकिस्तानविरुद्ध तटस्थ ठिकाणी खेळताना कायम चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे यावेळेसही भारतीय संघ पाकिस्तानला धोबीपछाड देईल यात काही शंका नाही.
आयसीसी स्पर्धेतील मागच्या चार सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केलंआहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत भारताने पाकिस्तानला 6 विकेटने मात दिली. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत पाकिस्तानला 6 धावांनी पराभूत केलं. 2023 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत 7 विकेटने, तर 2022 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 4 विकेटने मात दिली. इतकंच काय तर आशिया कप स्पर्धेत दोन्ही संघ तीन वेळा आमनेसामने आले होते. तिन्ही वेळेस भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे भारताचं मनोबल पाकिस्तानच्या तुलनेत चांगलं आहे. आता या सामन्यात नेमकं काय होतं? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.
