Explain : कोचिंगचा अनुभव नसतानाही BCCI ने गौतम गंभीर यांना हेड कोच का बनवलं?
IPL 2024 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने किताब जिंकल्यापासूनच टीम इंडियाच्या हेड कोच पदाच्या शर्यतीत गौतम गंभीर यांचं नाव आघाडीवर होतं. गौतम गंभीर यांना प्रत्यक्ष असा कोचिंगचा अनुभव नाहीय. तरीही त्यांना टीम इंडियात इतकी महत्त्वाची जबाबदारी का देण्यात आली आहे? यामागे बीसीसीआयचा काय विचार आहे?
जवळपास 7 वर्ष 8 महिन्यांच्या एका मोठ्या गॅपनंतर गौतम गंभीर टीम इंडियाच्या सेवेत दाखल होणार आहेत. टीम इंडियाचे माजी स्टार ओपनर गौतम गंभीर ड्रेसिंग रुममध्ये परतणार आहेत. टीम इंडियाला दोनवेळा वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यात गौतम गंभीर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. टीम इंडियात आता त्यांचा कोचचा रोल असणार आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने गौतम गंभीर यांना टीम इंडियाच कोच म्हणून नियुक्त केलं आहे. गंभीर राहुल द्रविड यांची जागा घेणार आहेत. मागच्या दीड महिन्यांपासून हेड कोच पदासाठी गौतम गंभीर यांच्या नावाची चर्चा होती. गंभीर आयपीएलमध्ये सलग तीन वर्ष मेंटॉर मार्गदर्शकाच्या भूमिकेत होते. त्यांना कुठल्याही लेव्हलवर थेच कोचिंगचा अनुभव नाहीय. पण असं काय आहे की, बीसीसीआयला गंभीर यांनाच कोच बनवायच होतं. त्यात ते यशस्वी झाले.
कुठल्याही खेळात, क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी ‘विनिंग मेंटलिटी’ आवश्यक असते. डोक्यात जिंकण्याचा विचार आणि विश्वास असावा लागतो. प्रत्येक खेळाडू, टीममध्ये विजयाबद्दल चर्चा होते. पण जिंकण्याचा आवेश, जिद्द उदाहरणाने सिद्ध करणारे फार कमी असतात. गौतम गंभीर त्या दुर्मिळ खेळाडूंपैकी एक आहे. माझ्या डोक्यात फक्त विजयाची गोष्ट चालते, हे गौतम गंभीर अनेकदा बोललाय. त्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. गंभीरच्या रेकॉर्डवरुन ते दिसतं. आयपीएलमध्ये कॅप्टन म्हणून दोन वेळा तर मेंटॉर म्हणून एकदा असं एकूण तीनदा गंभीरने केकेआरला चॅम्पियन बनवलं. गंभीर यांना फक्त 6 वनडे सामन्यात टीम इंडियाच नेतृत्व करण्याची संधी मिळाली. हे सर्व सामने भारताने जिंकले.
गंभीरची कॅप्टनशिप आणि कोचिंगची फिलॉसफी काय?
2007 आणि 2011 ची वर्ल्ड कप फायनल कोण विसरेल?. या दोन्ही वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये गौतम गंभीरने फलंदाजीत महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं. 2007 T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका जोहान्सबर्गमध्ये पाकिस्तान विरुद्ध गंभीरने 54 चेंडूत 75 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केलेली. त्यानंतर 2011 वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध 122 चेंडूत 97 धावांची खेळी केली. वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये गंभीरला शतक पूर्ण करण्याची संधी होती. पण त्याने संघ हिताला प्राधान्य देत, जे आवश्यक होतं ते केलं. गंभीरची कॅप्टनशिप आणि कोचिंगची फिलॉसफी खूप स्पष्ट आहे. त्याच्या नजरेत टीमचे सर्व खेळाडू समान आहेत. आपल्या एका इंटरव्युमध्ये गौतम गंभीर या बद्दल बोललेला.