त्रिपुरा दंगलीचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्यामागे भाजपचाच हात असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. देशभरात वाढलेल्या महागाईविरोधात संजय राऊत यांच्या नेतृत्वात आज औरंगाबादमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त औरंगाबादमध्ये असताना संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रात पेटलेल्या दंगलींचे कारण काय असा प्रश्न विचारला असता, संजय राऊत म्हणाले, ज्या रझा अकादमी संघटनेद्वारे हे लोण पसरवलं जातंय, त्यामागे कोणता पक्ष आहे, हे सर्वश्रुत आहे. अनेक वर्षांपासून या संघटनेला भाजपचेचे खतपाणी आहे. आज महाराष्ट्रात सुरु असलेल्या जाळपोळ आणि दंगलींमागे कोण आहे, हे यावरून स्पष्ट होते. रझा अकादमी हे भाजपचंच पिल्लू आहे. त्यामुळे त्यांच्याच पाठिंब्याने त्रिपुरातलं लोण इथवर पोहोचलं आहे.