Amit Satam : BMC इज नॉट फॅमिली बिझनेस… भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
अमित साटम यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचे संकेत दिले. यावेळी त्यांनी विकासाला महत्त्व देत, मेट्रो, अटल सेतू, कोस्टल रोड यांसारख्या प्रकल्पांवर भाष्य केले. मुंबई महानगरपालिका म्हणजे कुणा एका परिवाराची जहागीर नाही, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार अमित साटम यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालाडमधील प्रभाग क्रमांक ४७ येथील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन केले. याप्रसंगी बोलताना त्यांनी महायुतीच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेत १५० हून अधिक जागा जिंकून महायुतीचाच महापौर निवडून येईल, असा विश्वास व्यक्त केला. मुंबईकरांमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीबद्दल मोठी उत्सुकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
अमित साटम यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. “कोण एकत्र येतंय किंवा कोण एकत्र येत नाहीये हे महत्त्वाचं नाहीये. गेल्या ११ वर्षांत मुंबई शहराचा विकास कोणी केला, या शहरात मेट्रो कोणी आणली, अटल सेतू कोणी केला, कोस्टल रोड कोणी केला किंवा बीडीडी चाळीतल्या मराठी माणसाला ५६० फुटांचे घर कोणी दिले, हे महत्त्वाचे आहे,” असे साटम म्हणाले. मुंबई महानगरपालिका ही कोणत्याही एका परिवाराची जहागीर नसून ती मुंबईकरांची आहे आणि येत्या काळात मुंबईकरच तिचा ताबा घेतील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
