मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन दोनच लोक राज्य सरकार चालवत आहेत. यावरुन त्यांना विरोधकांच्या टीकेलाही सामोरं जावं लागतंय. इतक्या दिवसानंतरही मंत्रिमंडळ स्थापन का होत नाही, असाही टोला लगावला जातोय. यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील अनेकदा टीका केली आहे. दरम्यान, शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून मनसेची भाजप आणि शिंदे गटाशी जवळीक वाढल्याचं दिसतंय. पत्रकारांच्या एका प्रश्नावर मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. गृहमंत्रीपद मिळाल्यास सरकारमध्ये सामील होऊ, असं अमित ठाकरेंनी म्हटलंय. अमित ठाकरेंच्या या मिश्किल वक्तव्याची सध्या चर्चा आहे.