Annamalais Mumbai : अण्णामलाईंची मुक्तापळं अन् ठाकरे बंधूंनी सुनावलं, तर राऊतांनी औकातच काढली

Annamalais Mumbai : अण्णामलाईंची मुक्तापळं अन् ठाकरे बंधूंनी सुनावलं, तर राऊतांनी औकातच काढली

| Updated on: Jan 12, 2026 | 8:50 PM

भाजप नेते अण्णामलाईंच्या मुंबई महाराष्ट्राचं शहर नाही या वक्तव्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती, तर संजय राऊत यांनी अण्णामलाईंच्या औकातवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मराठी माणसाला धमक्या देण्यावरून हल्ला चढवला. देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले.

भाजप नेते अण्णामलाई यांनी मुंबईबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. मुंबई हे महाराष्ट्राचे शहर नसून एक आंतरराष्ट्रीय शहर आहे, असे अण्णामलाई मुंबईत बोलताना म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर ठाकरे बंधूंनी, म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे यांनी तर, भाजपच्या मनात जे आहे, तेच अण्णामलाईंच्या ओठावर आल्याचे म्हटले.

या टीकेला प्रत्युत्तर देताना अण्णामलाई यांनी, आपण ठाकरेंच्या धमक्यांना घाबरत नाही आणि मुंबईत येणारच, असे म्हटले. सामनामध्ये आपल्याबद्दल धमक्या दिल्याचा दावाही त्यांनी केला. यानंतर, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी अण्णामलाईंवर जोरदार पलटवार केला. मराठी माणसाला धमक्या देणाऱ्या अण्णामलाईंची औकात काय, असा सवाल राऊत यांनी विचारला. त्यांना त्यांच्या राज्यातही कोणी विचारत नाही, असे राऊत म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र, अण्णामलाईंच्या वक्तव्याचे स्पष्टीकरण देत, त्यांना मुंबई महाराष्ट्राची नाही असे म्हणायचे नव्हते, तर ते एक आंतरराष्ट्रीय शहर आहे असे म्हणायचे होते, असे सांगितले.

Published on: Jan 12, 2026 08:50 PM