कोल्हापूर : निसर्गाच्या लहरीपणाचा सामना आता मुक्या जनावरांनादेखील करावा लागत आहेत. आतापर्यंत सततच्या पावसामुळे पिकांचे तर नुकसान झालेच पण हा पाऊस आता वन्यजीवांसाठी धोक्याचा ठरत आहे. असाच प्रकार कोल्हापुरात समोर आला आहे. पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले जवळच्या नदी पात्रातील झाडांवर वानरांचा कळप दोन दिवसांपासून अडकलेला होता. नदीतील पाण्याचा प्रवाह हा कमी होत नसल्याने वानरांची सुटका करण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. अखेर तिसऱ्या दिवशी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या जवानांनी वानरांची सुटका केली आहे. त्यासाठी त्यांनी दोरीचा वापर केला. दोरीच्या सहाय्याने वानरांना झाडावरुन उतरवण्यात आले. एवढेच नाहीतर भुकलेल्या वानरांसाठी केळी आणि फळांची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्हा व्यवस्थापन समितीच्या जवानांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.