महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आता IPS नेमा, अंजली दमानिया यांची मागणी
महाराष्ट्रातील अनेक नेते, उपमुख्यमंत्री शिर्डीच्या नावाखाली नाशिकच्या या भोंदूबाबाकडे जात होते. नेते जातात म्हणून सामान्य मंडळी देखील जात होती.अंधश्रद्धा पसरवणाऱ्या या सर्व नेत्यांवर कारवाई करायला हवी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.
नाशिक भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अखेर महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरुन राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे. यापुढे महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर आयपीएस किंवा निवृत्त जजेसची नियुक्ती व्हावी म्हणजे महाराष्ट्राच्या महिलांना न्याय मिळेल असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. रुपाली चाकण यांनी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायचा की नाही हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे असेही त्या म्हणाल्या. सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत. त्या तीन दिवस हे सर्व पाहात होत्या. मात्र त्यांनीही कोणतेही पाऊल उचलले नाही. अखेर सर्वांनीच पत्रकार परिषदा घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राजीनामा घेतला.राजीनामा देताना आणि नंतर रुपाली चाकणकर काही बोलल्यात विनम्रता नव्हती, केवळ अहंकार होता असेही दमानिया यांनी म्हटले आहे. हा पहिला टप्पा झाला आहे, आता यापुढे यात ज्यांचे – ज्यांचे फोटो आले आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. विकास दिवटे यांची आत्महत्या झाली आहे त्यासर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे असे पत्र मी पोलिस महासंचालक सदानंद दाते यांना लिहीले असल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे.
