महाराष्ट्रात भाजपच्या नवनिर्वाचित केंद्रीय मंत्र्यांची जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे.केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रेप्रकरणी औरंगाबादमध्ये जवळपास 100 ते 150 आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. औरंगाबादमधील 13 पोलीस ठाण्यांमध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ठिकठिकाणी जनआशीर्वाद यात्रेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात येत आहेत. महाराष्ट्रात केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे, राज्यमंत्री कपिल पाटील, राज्यमंत्री भारती पवार आणि राज्यमंत्री भागवत कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रा सुरु आहेत. विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून कोरोनाकाळातील यात्रांवर टीका करण्यात येत आहे.