Bachchu Kadu | प्रहारचा आवाज ठाम; एकनाथ शिंदेंचा पाईक होईन पण तडजोड नाही, बच्चू कडूंचा स्वाभिमानी सूर कायम
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नावाची चर्चा रंगत असताना, त्यांनी पत्रकार परिषद घेत या सर्व घडामोडींवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेनेकडून उमेदवारीसाठी काही अटी घालण्यात आल्याच्या चर्चांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नावाची चर्चा रंगत असताना, त्यांनी पत्रकार परिषद घेत या सर्व घडामोडींवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेनेकडून उमेदवारीसाठी काही अटी घालण्यात आल्याच्या चर्चांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना बच्चू कडू म्हणाले, “विधान परिषदेसाठी अर्ज भरण्याची तयारी माझ्याकडे आहे. संधी मिळाली तर एकनाथ शिंदे यांचा पाईक म्हणून काम करेन. मात्र, आमच्यासाठी दिव्यांग, शेतकरी आणि मजूर हेच सर्वात महत्त्वाचे आहेत. केवळ पदासाठी युती करणारा बच्चू कडू नाही.” त्यांनी प्रहार संघटनेच्या बळावरही भाष्य करत, “आमच्या संघटनेचे एक लाखांहून अधिक सदस्य आहेत. आम्ही कोणाचाही पाठिंबा घेतला नाही आणि देतही नाही,” असे स्पष्ट केले. विलिनीकरणाच्या चर्चांबाबत बोलताना त्यांनी नाराजी व्यक्त केली. “प्रहार पक्ष विलीन करण्याच्या चर्चांमुळे वाईट वाटले. या केवळ बातम्यांमधून तयार झालेल्या चर्चा आहेत,” असे ते म्हणाले.
दरम्यान, एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्यासोबत झालेल्या भेटीचा उल्लेख करत, “भेट झाली होती, पण या विषयावर सविस्तर चर्चा झालेली नाही. आमचे मुद्दे महत्त्वाचे आहेत, त्यावर चर्चा होणे गरजेचे आहे,” असे कडू यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “प्रहारवर अन्याय करण्याची कोणाची हिंमत नाही. आमचीही क्षमता आहे. आम्हाला एक जागा मिळाली असती.” तसेच, “शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांना न्याय देण्यासाठी निर्णय घ्यावा,” असे आवाहन त्यांनी एकनाथ शिंदे यांना केले.
एकूणच, विधान परिषदेसाठी उमेदवारी आणि संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांवर बच्चू कडू यांनी स्पष्ट भूमिका घेतल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.