पालघर : पालघर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय. ‘काँग्रेसचा विचार हाच देशाला, संविधानाला व सर्व जातीधर्माच्या लोकांना तारणारा आहे. काँग्रेसला इतिहास आहे व भविष्यही आहे. परंतु भारतीय जनता पक्षाकडे इतिहासही नाही आणि भविष्यही नाही. भाजपने देश विकायला काढला आहे. डॉ. बाबासाहेब आंबडेकरांनी दिलेले संविधानही बदलण्याचा घाट घातला आहे. अशा भाजपाचे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये समूळ उच्चाटन करा, असं आवाहन नाना पटोले यांनी मतदारांना केलंय. जिल्हा परिषद निवडणुकीनिमित्त पालघर जिल्ह्यातील प्रचारसभेत पटोले बोलत होते. यावेळी पटोले म्हणाले की, ‘काँग्रेसचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पालघर जिल्ह्याच्या विकासाची संकल्पना मांडून जिल्हा निर्मितीचा निर्णय घेतला, त्यासाठी जादा निधीही दिला. आजही काँग्रेस पक्ष पालघरच्या विकासासाठी कट्टीबद्ध आहे. सामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका काँग्रेसची आहे. भाजपा सरकारच्या काळात आदिवासींसाठी असलेली खावटी योजना जाणीवपूर्वक बंद करण्यात आली होती ती मविआ सरकारने पुन्हा सुरु केली’.