100 कोटी वसुली प्रकरणाबरोबरच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीबीआयकडून राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना समन्स पाठवुन चौकशीला बोलावलंय. याआधी याच प्रकरणात सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासाहित अनेक अधिकाऱ्यांची चौकशी केलेली आहे आणि जबाबही नोंदवलाय.
मागील काही दिवसांपासून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे ईडी आणि सीबीआयच्या रडारवर आहेत. परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्यानंतर त्यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला त्यानंतर लागलीच त्यांच्यामागे सीबीआय आणि ईडीचा ससेमीरा लागला. मात्र आता चौकशीच सत्र हे राज्यातील बड्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचताना दिसतंय. मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडून अधिक माहिती घेण्यासाठी सीबीआयने समन्स पाठवून चौकशीला बोलावलंय. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या बाबतीत कथित भ्रष्ट्राचार प्रकरणात चौकशीसाठी हे समन्स बजावल्याची माहिती सूत्रांनी दिलीय..