Dattatray Bharne : मी खूप समंजस माणूस, चुकणारा नाही; कोकाटेंना शिक्षा मिळताच नव्या कृषीमंत्र्यांच्या विधानाची चर्चा; नेमकं काय म्हणाले?
मंत्री दत्तात्रय भरणे हे उद्या कृषीमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारी आल्या तर योग्य ती कारवाई करेन, असं वक्तव्य माध्यमांशी बोलताना मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं.
गेल्या काही दिवसांपासून राज्याचं कृषीमंत्री पद चांगलंच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. कृषीमंत्री पदावर असताना माणिकराव कोकाटे यांनी काही वादग्रस्त वक्तव्य केले. इतकंच नाहीत तर अधिवशेन सुरू असताना सभागृहात कोकाटे आपल्या मोबाईल फोनवर रमी गेम खेळताना कॅमेऱ्यात कैद झालेत. यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरल्यानंतर कोकाटेंचा राजीनामा न घेता त्यांच्या खात्यात बदल करण्यात आलाय. दरम्यान, कोकाटेंनंतर नवे कृषीमंत्री यांनी देखील अजब वक्तव्य केलं होतं. ‘तुमच्यासमोर मी उभा आहे. कारखान्याचा संचालक असताना काम जर मी… सरळ काम तर सगळेच करतात, पण एखादं असं वाकडं करून पुन्हा नियमांत बसवणारं काम जे करतात त्याची माणसं नोंद ठेवतात’, असं भरणे म्हणाले होते. मात्र आता कोकाटेंना शिक्षा मिळताच मी चुकणारा माणूस नाही, मी खूप समंजस माणूस असल्याचे दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे.
