आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रिया आणि परीक्षेतील मोठा गैरव्यवहार आता समोर आलाय. त्यानंतर म्हाडाच्या परीक्षेचाही पेपर फुटल्याचं समोर आलंय. त्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री म्हाडाच्या सर्व परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, सातत्यानं सुरु असलेल्या पेपरफुटीमुळे राज्यातील तरुणांना आणि विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. अशावेळी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. पेपरफुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी आक्रमक भूमिका फडणवीस यांनी घेतलीय.
‘परीक्षा जाहीर करायच्या आणि नंतर त्या पेपरफुटीच्या नावाखाली रद्द करायच्या, अशा प्रकारचा काळा कारभार सातत्याने सुरु आहे. एक परीक्षा यांना धड घेता येत नाही. मागे आरोग्य विभागाच्या परीक्षेतही तीन-तीन वेळा परीक्षा रद्द झाल्या. पेपर फुटला आणि त्याचा तार मंत्रालयापर्यंत गेलेली आहे. त्यामुळे या परीक्षांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरु आहे. या सगळ्या कारभारामुळे राज्यातील तरुणांची प्रचंड ओढाताण सुरु आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणी कडक कारवाई केली पाहिजे. यामध्ये कोण दोषी आहे? कुणावर तरी दोषारोप झाला पाहिजे. मात्र कुणावरही दोषारोप होत नाही. मंत्री नामानिराळे, मुख्यमंत्री नामानिराळे. हे चालणार नाही, याबाबत फार मोठा रोष आहे. यावर कडक कारवाई व्हावी. आमची तर मागणी आहे या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे’, अशी आक्रमक भूमिक देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे.