आज लोकसभा निवडणुकीचं दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. या दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, आणि परभणी या महाराष्ट्रातील आठ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात देशातील एकूण 13 राज्य आणि केंद्र शासित प्रदेश मिळून 89 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. महाराष्ट्रात आज एकूण 8 लोकसभा मतदारसंघात मतदान सुरु आहे. दरम्यान, वर्धा जिल्ह्यातील देवरी येथे संतापजनक प्रकार बघायला मिळाला. सकाळीच मतदार मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले मात्र वर्धा जिल्ह्यातील देवरी येथील यशवंत प्राथमिक शाळा येथील मतदान केंद्रावर असणाऱ्या ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड असल्याने मतदारांना आपला हक्क बजावता आला नाही. या मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद असल्यामुळे सात वाजल्यापासून रांगेत असलेले मतदार संभ्रमात असल्याचे पाहायला मिळाले. तर तांत्रिक कारणामुळे मशीन बंद पडल्याची माहिती समोर आली.