Marathwada Floods : मराठवाड्यात निसर्गाचा कहर सुरूच, मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती

Marathwada Floods : मराठवाड्यात निसर्गाचा कहर सुरूच, मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती

| Updated on: Sep 28, 2025 | 10:46 AM

महाराष्ट्रात संततधार पावसामुळे मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये घरांमध्ये पाणी शिरले, बजाज कंपनीतही पाणी साचले. नांदेड आणि लातूरमध्ये नद्यांना पूर आला असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये, विशेषतः मराठवाड्यात, संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसामुळे मुकुंदवाडीतील घरांमध्ये पाणी शिरले असून मोठे नुकसान झाले आहे. वैजापूर तालुक्यातील भिवगावमध्येही पाणी शिरल्याने एनडीआरएफने १२ जणांना सुरक्षित बाहेर काढले.

शहरातील बजाज कंपनीच्या परिसरात गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. नांदेड जिल्ह्यातील विष्णूपुरी प्रकल्पाचे १६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. गोदावरी नदीपात्रात २ लाख ९८ हजार क्युसेकने विसर्ग सुरू असल्याने हजारो हेक्टरवरील शेती पिकांना फटका बसला आहे. लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीलाही पूर आल्याने १४ बंधाऱ्यांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत, तर भातखेडजवळील जुना पूल पाण्याखाली गेला आहे.

जालनाच्या भोकरदन तालुक्यात पूर्णा नदीला पूर आल्याने निमगावातील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे हसनाबाद-भोकरदन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. वर्ध्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या ३० ते ३५ नागरिकांना गिरड पोलिसांनी दोरखंडाच्या साहाय्याने वाचवले. गंगापूर तालुक्यातील आनंदवाडीत ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने सोयाबीन आणि कपाशी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Published on: Sep 28, 2025 10:42 AM