Marathwada Flood : मराठवाड्याला पुन्हा झोडपलं, गावांचा संपर्क तुटला, पुराच्या पाण्यात वाहून गेले शेतकरी अन्…

Marathwada Flood : मराठवाड्याला पुन्हा झोडपलं, गावांचा संपर्क तुटला, पुराच्या पाण्यात वाहून गेले शेतकरी अन्…

Harshada Shinkar | Updated on: Sep 27, 2025 | 5:08 PM

मराठवाड्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. धाराशिव, लातूर, बीड, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. नद्यांना पूर येऊन अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत, शेतात पाणी साचले आहे, तर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वाहतूक ठप्प झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. धाराशिव जिल्ह्यात अनेक नद्या-नाल्यांना पूर आला असून, आर्णीतील काही शेतकरी पुरातून सुखरूप बाहेर पडले. भूम परंडा वाशी भागांत मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे, ज्यामुळे शेतात पाणी साचले आहे आणि पातरूड-ईट मार्ग बंद झाला आहे. लातूर जिल्ह्यातही अतिवृष्टी झाली असून, निलंगा ते कासार शिरसी हा तेरणा नदीवरील मार्ग पुरामुळे बंद झाला आहे.

अहमदनगर ते हगदळ गावाजवळील पूलही मनाड नदीच्या पाण्याखाली गेल्याने वाहतूक थांबली आहे. चाकूर आणि उदगीर तालुक्यात संततधार पावसामुळे वडवळ आणि नेहरगाव येथे जनजीवन विस्कळीत झाले, घरांमध्ये पाणी शिरले आणि अनेक गावांचा संपर्क तुटला. बीड शहरातील बिंदूसरा नदीला पूर आला असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नांदेड जिल्ह्यात नदी-नाल्यांना पूर येऊन लोहा तालुक्यातील लोंढे सावंगीमध्ये कापूस आणि सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील कोंडूर डिग्रस शिवारातील रस्ताही खचला आहे, ज्यामुळे एकूणच मराठवाड्यात पावसाने गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे.

Published on: Sep 27, 2025 5:08 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us