धरण पाणलोट क्षेत्रासह कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाची संततधार कायम राहिली आहे.हीच परिस्थिती इचलकरंजी शहर परिसरात देखील कायम राहिली आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ५४ फुटांवर पोहचून ती आता धोक्याची पातळी ओलांडली आहे.त्यामुळे नदीवरील लहान पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच प्रशासनाने पूरबाधित क्षेत्र व नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील भुदरगड , राधानगरी ,गगनबावडा,पन्हाळा , शाहूवाडी ,आजरा ,चंदगड या तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाची संततधार कायम राहिली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर सर्व नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होत चालली आहे. तसेच इचलकरंजी शहरात वाहणा-या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सध्या झपाट्याने वाढ होवू लागली आहे.याठिकाणी सध्या पाणी पातळी ५४ फुटांवर असून धोक्याची पातळी ओलांडली आहे.