Ladki Bahin Yojana : ज्या महिलांचे पती, वडील नाही अशा लाडक्या बहिणींसाठी मोठे बदल, KYC बद्दल आदिती तटकरेंची मोठी माहिती
लाडकी बहीण योजनेच्या केवायसी प्रक्रियेतील अडचणी लवकरच दूर होतील, असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. सध्या वेबसाईटवर रोज ४-५ लाख ई-केवायसी पूर्ण होत असून, विधवा किंवा घटस्फोटित महिलांसाठी विशेष पर्याय उपलब्ध केले जात आहेत. नैसर्गिक आपत्तींमुळे कागदपत्र गमावलेल्यांना मुदतवाढ दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या केवायसी प्रक्रियेतील सद्यस्थिती आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) च्या निवडणुकीवर आपले मत व्यक्त केले. लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी पूर्ण करण्यात येणाऱ्या अडचणींवर बोलताना अदिती तटकरे यांनी सांगितले की, योजनेच्या वेबसाईटमध्ये आवश्यक बदल केले जात आहेत. रोज साधारणपणे चार ते पाच लाख महिलांचे ई-केवायसी पूर्ण होत आहे, आणि एक कोटीहून अधिक महिलांनी आतापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत अथवा घटस्फोट झाला आहे, त्यांच्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटाचे कागदपत्र अपलोड करण्याचे पर्याय वेबसाईटवर तयार केले जात आहेत.
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्या महिलांनी कागदपत्र गमावली आहेत, त्यांना मुदतवाढ दिली जाईल. १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसीची प्रक्रिया सुरू असून, कोणतीही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.
