माझाही साखर कारखाना प्रचंड आर्थिक अडचणीत आहे, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. मात्र, हे विधान करतानाच आजारी आणि आर्थिक नुकसानीत असलेल्या साखर कारखान्यांबाबत पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारला उपायही सूचवला आहे. पंकजा मुंडे या दिल्लीत आहेत. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मीडियाशी संवाद साधला. राज्यातील सहकारावरही त्यांनी भाष्य केलं. राज्यात सहकार अडचणीत आहे. अनेक कारखान्यांना दुष्काळाचा फटका बसला आहे. मीही त्याचा भाग आहे. माझाही कारखाना प्रचंड आर्थिक नुकसानीत आहे. शेतकऱ्यांसाठी उस गाळप करताना शेतीवर आधारीत उद्योगांना वेगळी वागणूक न देता ऊसाचे भाव वाढवतो तसेच साखरेच्या आणि इथेनॉलच्या भावाबाबत निर्णय घेतला पाहिजे.