Video | अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी 10 वाजल्यापासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. रखरखत्या उन्हात गेल्या 6 तासांपासून ते उपोषणावर ठाम असून परिसरात मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित आहेत.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी 10 वाजल्यापासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. रखरखत्या उन्हात गेल्या 6 तासांपासून ते उपोषणावर ठाम असून परिसरात मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित आहेत.
काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप नेते प्रसाद लाड यांनी सुमारे दीड तास चर्चा करून उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र, मागण्यांबाबत ठोस निर्णय न झाल्याने जरांगे यांनी उपोषण सुरू करण्याचा निर्णय कायम ठेवला.
जरांगे यांनी उपोषण सुरू करताच राज्य सरकारची धावपळ वाढली आहे. त्यांच्या प्रमुख मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी शासनाने विशेष अधिकृत मसुदा तयार केल्याची माहिती समोर आली आहे. हा मसुदा घेऊन सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत दाखल झाले आहे.
दरम्यान, शिर्डीहून मुंबईकडे रवाना झालेले प्रसाद लाड यांना मुख्यमंत्र्यांचा फोन आल्यानंतर ते पुन्हा अंतरवाली सराटीकडे परतल्याची माहिती मिळाली आहे. ते पुन्हा एकदा मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चेचा प्रयत्न करणार आहेत.
