Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
मनोज जरांगे पाटील यांनी १५ सप्टेंबरपासून अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या आझाद मैदानाकडे मराठा मोर्चाची घोषणा केली आहे. १९ सप्टेंबर रोजी आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू होईल. या विराट जनसागरात सामील होण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी मराठा बांधवांना मार्गावर उपस्थित राहण्याचे आवाहन जरांगे पाटलांनी केले आहे.
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी १५ सप्टेंबरपासून अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने विराट मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर १९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता आमरण उपोषण सुरू केले जाईल, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
या मोर्चाचा तपशीलवार मार्ग आणि मुक्कामाची ठिकाणे त्यांनी जाहीर केली आहेत. १५ सप्टेंबरला अंतरवालीतून सकाळी १० किंवा ११ वाजता निघून पाटोदा येथे मुक्काम असेल. १६ सप्टेंबर रोजी श्रीगोंदा (अहिल्यानगर जिल्हा) आणि १७ सप्टेंबरला हडपसर (पुणे जिल्हा) येथे मुक्काम होईल. त्यानंतर १८ सप्टेंबर रोजी खोपोली (रायगड जिल्हा) येथे थांबा घेऊन १९ सप्टेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर हा मोर्चा पोहोचेल.
जरांगे पाटील यांनी मराठवाडा, विदर्भ-खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील मराठा बांधवांना कुटुंबीयांसह या मोर्चात सामील होण्याचे किंवा मार्गावर उपस्थित राहून आशीर्वाद देण्याचे आवाहन केले आहे. तसेच, प्रशासनाने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास भाजपला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.
