मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या औरंगाबादमधील (Aurangabad) भाषणाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्याकडे पाहून, मुख्यमंत्र्यांनी त्यांना भावी सहकारी म्हटलं. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रावसाहेब दानवे यांनाच टोमणा लगावला. रावसाहेब दानवे यांनाच शिवसेनेत यायचं असेल तर? असं म्हणत भुजबळांनी टोला लगावला. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
छगन भुजबळ म्हणाले, “चांगली गोष्ट आहे.राजकारणात विरोधी पक्ष आपले दुश्मन नसतात. वैचारिक मतभेद असू शकतात पण दुश्मन नाही. कदाचित दानवे शिवसेनेत येणार असतील तर”. काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे मुख्यमंत्र्यांना त्रास होतोय या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याशी मी सहमत होऊ शकत नाही. कारण काँग्रेस, राष्ट्रवादीचा काहीही त्रास मुख्यमंत्र्यांना नाही. उलट मागील 5 वर्ष भाजपाने शिवसेनेला कशी वागणूक दिली सगळ्यांना माहित आहे. केंद्र सरकारमध्ये शिवसेनेला दिलेले मंत्रीपद आणि केलेली अवहेलनाही पाहिली, असंही छगन भुजबळ म्हणाले.