Avinash Jadhav : आमचं अपयश हे जनतेनं दिलेलं नाही तर… अविनाश जाधवांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
मनसे नेते अविनाश जाधव यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. मतदार याद्यांमधील घोळ, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये झालेला विलंब आणि भाजपच्या जातीय राजकारणावर त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असून, हे जनतेचे अपयश नसून आयोगाचे अपयश असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.
ठाणे येथे मनसे नेते अविनाश जाधव यांनी निवडणूक आयोग आणि सत्ताधारी पक्षावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. भारतीय नागरिकांना आता निवडणूक आयोगाकडून फारशा अपेक्षा राहिल्या नसल्याचे ते म्हणाले. मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ असून, याद्या स्वच्छ होईपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी जाधव यांनी केली. अनेक वर्षांपासून ही मागणी करत असतानाही, आता निवडणूक आयोगाला निवडणुका घेण्याची घाई लागल्याचे ते म्हणाले.
अविनाश जाधव यांच्या मते, ८०० ते ९०० लोकांच्या यादीत २००-२५० नावे मिळत नसतील, तर अशा निवडणुका कशासाठी घेतल्या जात आहेत. निवडणूक आयोग आपल्या अधिकारांचा गैरवापर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुका गेल्या २ ते ५ वर्षांपासून प्रलंबित असताना, आता अचानक आयोगाला निवडणुका घेण्याची घाई झाली आहे. सत्ताधारी पक्षाचे अपयश हे जनतेने दिलेले नसून, ते निवडणूक आयोगाने दिलेले आहे, असे अविनाश जाधव यांनी स्पष्ट केले.
