Raj Thackeray : …नाहीतर मुंबई हातातून जाईल, मराठी माणसासाठी BMC निवडणूक शेवटची… राज ठाकरेंचा गंभीर इशारा
राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणूक मराठी माणसासाठी शेवटची ठरू शकते, असा इशारा दिला. यावर महायुतीच्या नेत्यांनी टीका करत, भावनिक मतांचा प्रयत्न असल्याचे म्हटले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी मतदारांना एक गंभीर इशारा दिला आहे. “रात्र वैऱ्याची, गाफील राहू नका,” असे ते म्हणाले. जर मराठी माणूस गाफील राहिला, तर मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक मराठी माणसासाठी शेवटची ठरेल, असे धक्कादायक विधान त्यांनी केले. मुंबईवर ताबा मिळवण्यासाठी राजकीय डावपेच सुरू असल्याचा आरोप करत, त्यांनी आजूबाजूला लक्ष ठेवण्याचे आवाहन केले. “मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल. जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग कुणालाच आवडता येणार नाहीत,” असे राज ठाकरे म्हणाले.
तर मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकारण तापले असून, मतदार याद्यांमधील कथित घोळावरून ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाला धारेवर धरले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला एक संयुक्त पत्र पाठवून मतदार याद्यांमधील त्रुटींवर आक्षेप घेतला आहे. या पत्रावर दोन्ही भावांच्या सह्या असून, त्यांनी हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी किमान २१ दिवसांचा कालावधी देण्याची मागणी केली आहे.
