Mumbai Weather | मान्सूनचा मुंबईला दगा! 11 जून उलटला, तरी पावसाचा थेंबही नाही; उकाड्याने मुंबईकर हैराण
मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा कायम आहे. अद्यापही मुंबईत दमदार पावसाची सुरुवात झालेली नाही. वाढलेला उकाडा आणि हवेत असलेली प्रचंड आर्द्रता यामुळे मुंबईकरांचे हाल होत असून, नागरिकांना उष्णतेचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा कायम आहे. अद्यापही मुंबईत दमदार पावसाची सुरुवात झालेली नाही. वाढलेला उकाडा आणि हवेत असलेली प्रचंड आर्द्रता यामुळे मुंबईकरांचे हाल होत असून, नागरिकांना उष्णतेचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, यंदा मान्सूनच्या प्रगतीला काही प्रमाणात विलंब झाला असून, एल निनोच्या प्रभावामुळे हवामानातील बदल जाणवत आहेत. दरम्यान, आज मुंबई आणि उपनगरांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. शहराच्या विविध भागांमध्ये ढगांची गर्दी दिसून येत असली तरी अद्याप समाधानकारक पावसाची नोंद झालेली नाही.
हवामान विभागाने मुंबईसह काही भागांमध्ये हलक्या सरी आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबईतील कमाल तापमान सुमारे 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 29 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे उष्णता आणि आर्द्रतेचा प्रभाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यातील 25 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, अकोला, अमरावती आणि इतर काही जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये पुढील काही दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवसांत नैऋत्य मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल राहण्याची शक्यता आहे. मात्र, 11 जून उलटूनही मुंबईत मान्सूनचे आगमन न झाल्याने नागरिकांची प्रतीक्षा वाढली आहे. येत्या काही दिवसांत मुंबईत पावसाची सुरुवात होण्याची शक्यता असली तरी सध्या वाढत्या उकाड्यामुळे मुंबईकरांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
