नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी ‘मैंने गांधी को क्यों मारा’ (Why I Killed Gandhi) या चित्रपटात नथुराम गोडसेची (Nathuram Godse) भूमिका साकारली आहे. या चित्रपटावरुन राज्यात पुन्हा एकदा मोठं राजकारण पाहायला मिळतंय. महत्वाची बाब म्हणजे अमोल कोल्हेंनी कलावंत म्हणून गोडसे साकारला असेल तर ते गांधीविरोधक ठरत नाहीत, असा शब्दात शरद पवार (Sharad Pawar) यांनी कोल्हेंची पाठराखण केलीय. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी या चित्रपटाचा निषेध केलाय. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या चित्रपटाला तीव्र विरोध केला आहे.
महात्मा गांधी हे आपल्या देशाची ओळख आहेत. त्यांची हत्या करण्याला हिरो बनवलं जात असेल तर येणाऱ्या पिढीला काय संदेश देणार? चित्रपट रिलीज झाला तर आम्ही त्याचा निषेध करु, तीव्र विरोध करु, असा इशारा पटोले यांनी दिला आहे. तसंच शरद पवार काय बोलले हा माझा विषय नाही. मात्र, गांधीजींची हत्या करण्याला हिरो बनवले जात असेल तर त्याचा आम्ही निषेध करु, अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिलीय. त्याचबरोबर आपण पंतप्रधान मोदींबाबत बोललो नसल्याचं सांगत मी चूक केलेली नाही. संबंधित व्यक्तीचा जबाब पोलिसांनी घेतल्याचं पटोले म्हणाले.