Nashik Car Accident | नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात काल रात्री एक भीषण अपघात घडला असून, विहिरीत कार कोसळल्याने एकाच कुटुंबातील 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कारचा ताबा सुटल्याने ती विहिरीच्या कठड्याला धडकली आणि थेट विहिरीत कोसळली.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात काल रात्री एक भीषण अपघात घडला असून, विहिरीत कार कोसळल्याने एकाच कुटुंबातील 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कारचा ताबा सुटल्याने ती विहिरीच्या कठड्याला धडकली आणि थेट विहिरीत कोसळली. मोठा आवाज झाल्याने आजूबाजूचे नागरिक घटनास्थळी धावून आले. सुरुवातीला काही मिनिटे गाडी पाण्यावर दिसत होती, मात्र गाडीच्या काचा बंद असल्याने आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. प्रवाशांनी काचा फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र काही वेळातच संपूर्ण गाडी पाण्यात बुडाली. घटनेनंतर सुमारे 20 मिनिटांनी अग्निशमन दल आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांनीही विहिरीतून पाणी बाहेर काढण्यासाठी मोटार आणि दोरखंडाच्या सहाय्याने प्रयत्न केले. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नांनंतर गाडी बाहेर काढण्यात यश आले. गाडीत 8 जण होते, तर एक लहान मुलगी विहिरीत आढळून आली. सर्वांना बाहेर काढल्यानंतर 9 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान आज सकाळी साडेनऊच्या सुमारास दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली. यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. पोलीस आणि प्रशासकीय अधिकारीही घटनास्थळी तैनात होते. गावकऱ्यांनी यावेळी संताप व्यक्त करत सांगितले की, संबंधित विहिरीबाबत त्यांनी दोन ते तीन वेळा तक्रारी केल्या होत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर याच निष्काळजीपणामुळे हा भीषण अपघात घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी आक्रोश व्यक्त केला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
