tv9 Marathi Special Report | नसरापूर प्रकरणावर राज्यभर संताप; पोस्टमॉर्टेम अहवालातील धक्कादायक खुलासे आले समोर…
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चिमुकल्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याच्या विरोधात राज्यभर संताप व्यक्त केला जात असून, त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चिमुकल्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याच्या विरोधात राज्यभर संताप व्यक्त केला जात असून, त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. पोस्टमॉर्टेम अहवालानुसार, पीडित मुलीचा मृत्यू ॲस्फिक्सिया म्हणजेच श्वास कोंडल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपीने मुलीच्या तोंडात कापड कोंबल्याने तिचा श्वास रोखला गेला. तसेच तिच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या असून छातीवरही गंभीर मारहाणीचे व्रण असल्याचे निष्पन्न झाले आहे. हा अहवाल पुण्यातील ससून रुग्णालयाकडून पोलिसांना सादर करण्यात आला आहे.
या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली असून विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहेत. विशेष म्हणजे आरोपीच्या कुटुंबीयांकडूनही त्याच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणांतील आरोपींना पॅरोल न देण्याबाबत कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणात आरोपीला जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात असून, न्याय प्रक्रियेवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
